मुंबई : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्याच्या संरक्षित क्षेत्रात पशुबळीच्या जुन्या प्रथेला घालण्यात आलेल्या बंदीमुळे वादाच्या भोव-यात अडकलेल्या पारंपरिक प्रथेला हायकोर्टाने दिलासा दिला. न्या. बी. पी. कुलाबावाला व न्या. एफ. पी. पूनावाला यांच्या खंडपीठाने विशाळगडावर पारंपरिक पध्दतीने १७ ते २१ जून हे चार दिवस पशुबळी (कुर्बानी) देण्यास परवानगी दिली.
पुरातत्व व वस्तुसंग्रहालय उपसंचालकांनी या विशाळगडावर पशुबळी प्रथा बंद करण्याच्या आदेशाविरोधात विशाळगडचे हजरत पीर मलिक रेहान मीरा साहेब दर्गा ट्रस्टतर्फे अॅड. सतीश तळेकर यांनी याचिका दखल केली आहे. ही याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशुबळी देण्यास परवानगी द्यावी अशी विनंती करणारा अर्ज हजरत पीर मलिक रेहान मीरा साहेब दर्गा ट्रस्टतर्फे अॅड. तळेकर यांनी दाखल केला.
अर्जावर न्या. कुलाबावाला व न्या. पूनावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळी अॅड. तळेकर यांनी विशाळगड परिसरातील दर्गा हा महाराष्ट्रातील सर्वांत प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखली जाते. अकराव्या शतकात हा दर्गा बांधण्यात आला. येथे हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही धर्माचे बांधव भेट देतात. मशीद व मकबरा येथे आजही हिंदू व मुस्लिम बांधवांमार्फत पूजा केली जाते. दर्ग्यात पशुबळी देणे ही अविभाज्य प्रथा असून सार्वजनिक ठिकाणी नव्हे तर खाजगी जागेवर या प्रथेचे पालन केले जात आहे.
प्राचीन काळी कोंबड्या, मेंढ्या बक-यांचे बळी देऊन गोरगरिबांना अन्नदान करण्याच्या हेतूने सुरू झालेली प्रथा कालांतराने धार्मिक प्रथा बनली आहे. मात्र उजव्या विचारसरणीच्या संघटना तसेच सत्ताधा-यांच्या राजकीय फायद्यासाठी या प्रथेवर बंदी घालणारा आदेश जारी केला गेला, याकडे खंडपीठाचे लक्ष वेधले. प्रथेवर घालण्यात आलेली बंदी १७ ते २१ जून दरम्यान विशाळगडावर चालणा-या उत्सवावेळी उठवावी अशी विनंती केली. ही विनंती मान्य करत खंडपीठाने चार दिवस कुर्बानीला परवानगी दिली आहे.