नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी (१५ फेब्रुवारी) रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण यात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली? याबाबत आता दिल्ली पोलीस आणि रेल्वे प्रशासन चौकशी करत आहे. मात्र, कुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती सांगण्यात येत आहे. चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर आता केंद्र सरकार अलर्ट झाले आहे.
गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर केंद्रीय राखीव पोलिस दल(सीआरपीएफ) आणि दिल्ली पोलिस तैनात करण्यात आले आहेत. महाकुंभमेळ्यादरम्यान वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
वृत्तानुसार, चेंगराचेंगरी सारख्या घटना पुन्हा घडू नये किंवा अशा घटना टाळण्यासाठी रेल्वेने देशातील ६० प्रमुख रेल्वे स्थानकांवर होल्डिंग झोन तयार करण्याची योजना आखली आहे. ६० पेक्षा जास्त रहदारीच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी हाताळण्यासाठी होल्डिंग झोन तयार करण्यात येणार आहेत.
संकट टाळण्यासाठी एआयची मदत घेणार
संकट व्यवस्थापनासाठी ‘एआय’ची देखील मदत घेतली जाणार असल्याचे म्हटले आहे. या बरोबरच स्थानिक अधिकारी संकट व्यवस्थापनाच्या अनुषंगाने प्रशिक्षण देखील घेतील असंही सांगण्यात येत आहे. या बरोबरच ‘एआय’सह तंत्रज्ञानाचा वापर गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात येणार आहे. विशेषत: ट्रेनच्या विलंबाच्या वेळी हा वापर करण्यात येणार आहे.