मुंबई : एका कार्यक्रमात बोलताना भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घराणेशाहीवर भाष्य केले आहे. शरद पवार यांनी आपली कन्या सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष केले म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. म्हणूनच अजित पवार बाहेर पडले. राज्याचे राजकारण सुरुवातीला ३० कुटुंबाभोवती फिरत होते, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.
मी पुन्हा येईन हे केवळ एक वाक्य नव्हते. मी कशासाठी येईन, हे देखील मी सांगितले होते. पण, लोकांनी ते एकच वाक्य प्रसिद्ध केले. मी पुन्हा येईल असे म्हणालो होतो. त्यानुसार मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो आहेच, पण, त्याचबरोबर दोन पक्ष फोडून आणि दोन साथीदारांना घेऊन आलोय, असे फडणवीस म्हणाले.
राजकीय नेत्यांचे मुलं-मुली राजकारणात येऊ नये असे माझे म्हणणे नाही. पण, त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर यावे. हक्क म्हणून येऊ नये. नेहरुंच्या घरातील व्यक्तीच काँग्रेसचे नेतृत्व करेल असे ठरलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याचे कारण तेच आहे. शरद पवारांनी अजित पवारांना तयार केले, पण ऐनवेळी आपल्या मुलीच्या हातात पक्ष दिला, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे पक्षाचे सर्व सूत्र आदित्य ठाकरेंना देण्याची तयारी करत होते. यासाठी विचारधारा सोडायला देखील तयार होते. त्यामुळे शिवसेना फुटली, असे फडणवीस म्हणाले.