22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रमी स्वबळावर राजकारणात येईन

मी स्वबळावर राजकारणात येईन

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे विधान केले होते. मात्र त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली नव्हती. दरम्यान, सोमवारी पाचव्या टप्प्यात झालेल्या मतदानानंतर रॉबर्ट वाड्रा यांनी निवडणूक लढवण्याबाबत पुन्हा एकदा मोठे विधान केले आहे. यावेळी शक्य झालं नाही. मात्र पुढच्या वेळी अवश्य निवडणूक लढवणार असे विधान रॉबर्ट वाड्रा यांनी केले आहे.

रॉबर्ट वाड्रा याविषयी म्हणाले की, जर काँग्रेस पक्षाची इच्छा असेल तर मी पुढच्या वेळी निवडणूक अवश्य लढवेन. मी सक्रिय राजकारणात यावे अशी लोकांची इच्छा आहे. राजकारणात सहज प्रवेश करता यावा हा समाजसेवा करण्यामागचा हेतू नाही. माझ्यासाठी राजकारणात प्रवेश करणे सोपे आहे. मात्र मी गांधी कुटुंबीयांमधील असल्याने नाही तर माझ्या कामाच्या जोरावर राजकारणात प्रवेश करेन, असे रॉबर्ट वाड्रा यांनी सांगितले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर रॉबर्ट वाड्रा यांना अमेठी येथून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरू झाली होती. याबाबत त्यांनी सांगितले होते की, मी अमेठीतल्या जनतेचे प्रतिनिधित्व करावे, त्यांच्या मतदारसंघात जावे, त्यांच्या समस्या ऐकाव्यात, त्यातून मार्ग काढावा, ज्यामुळे ते प्रगती करू शकतील, अशी अमेठीमधील लोकांची इच्छा आहे. मी सुद्धा राजकारणात येण्यासाठी इच्छुक आहे. मात्र याबाबतचा निर्णय हा योग्य वेळी घेतला जाईल, मात्र सध्या कुठलीही घाई नाही आहे असे रॉबर्ट वाड्रा म्हणाले होते.

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या अमेठी येथून निवडणूक लढवण्याबाबत संभ्रमाचं वातावरण असताना रॉबर्ट वाड्रा यांनी गांधी कुटुंबाचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठी येथून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र काँग्रेसने रॉबर्ट वाड्रा यांना उमेदवारी न देता अमेठी येथूम स्मृती इराणी यांच्याविरोधात के. एल. शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR