मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार सातत्याने शरद पवारांच्या वयावर टीका करत आहेत. अजित पवारांच्या या टीकेनंतर शरद पवारांनी निवडणूक न लढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. खासदारकीची सध्याची टर्म संपल्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, माझी खासदारकी अडीच वर्षांनंतर संपत आहे. त्यानंतर मी निवडणूक लढणार नाही हे मी ठरविले आहे. माझी खासदारकीची टर्म शिल्लक आहे. त्यामुळे मी तोपर्यंत काम करत राहणार आहे. मला लोकांनी तिथं पाठवलंय. तिथं मी काम करू नको का? माझ्या वयावर सातत्याने बोलले जाते. मी १९६७ पासून राजकारणात आहे. माझ्या विरोधकांनीही कधी यावर टीका केली नाही. मी अनेक संस्थांचा आजीवन अध्यक्ष आहे. तिथे मी काम करत राहणार आहे.
राहुल नार्वेकर मुख्यमंत्री शिंदेंना भेटत असतील तर संशयाला जागा, राहुल नार्वेकरांनी प्रतिमा जपली पाहिजे. देवेंद्र फडणवीस उद्याच्या निकालानंतर सरकार स्थिर राहील असे म्हणत असतील तर याचा अर्थ त्यांना निकालाबाबत माहिती आहे, असे शरद पवार म्हणाले. तसेच राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिमा जपली पाहिजे, असा सल्ला शरद पवारांनी नार्वेकरांना दिला आहे.
राम श्रद्धेचा विषय आहे. पक्षांकडून कोणीही रामाबाबत वक्तव्य केलेले नाही. जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य पक्षाचे वक्तव्य नाही. मुंबईचे पालकमंत्री शाळांमध्ये रामाबाबत स्पर्धा घेण्यासाठी सक्ती करत आहेत हे योग्य नाही. हा देश सेक्युलर देश आहे. मी गर्दीत रामाच्या दर्शनाला जाणार नाही. माझा राज्यसभेचा कार्यकाळ अडीच वर्षांनंतर संपत आहे त्यानंतर जाईल, असे शरद पवार म्हणाले.
विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या ईडीच्या छापेमारीवर बोलताना शरद पवार म्हणाले, केंद्रातलं सरकार बदलत नाहीत तोवर असे छापे सुरूच राहणार आहेत.