22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रमारण्याचा प्रयोग केल्यास महाराष्ट्रातील एकही रस्ता खुला राहणार नाही

मारण्याचा प्रयोग केल्यास महाराष्ट्रातील एकही रस्ता खुला राहणार नाही

जरांगेंचा सरकारला इशारा

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोप करत थेट इशारा देखील दिला आहे. आमच्या आंदोलनाला कुठलेही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका, मारण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातला एकही रस्ता वर्षानुवर्षे खुला राहणार नाही, आणि हेही चॅलेंज बघायचे असेल तर बघा, असा थेट इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

मराठा आरक्षण यात्रा पुणे जिल्ह्यातून मुंबईकडे जात असून, यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, मराठा समाज एकत्रित आहे, तरीही त्यांच्या लक्षात येत नाही. हे आंदोलन किती गांभीर्याने घ्यायचे हे त्यांच्या लक्षात येत नाही. शब्द दिल्यामुळे त्यांना यायला लाज वाटत असेल, त्यामुळे सरकारने शहाणपणाने घेतले तर बरे राहील. समाजाला वेड्यात काढणे सोडावे. आरक्षण मिळाले तरी माझ्या जातीपुढे अनेक प्रश्न आहेत.

तसेच, मारण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातला एकही रस्ता वर्षानुवर्षे खुला राहणार नाही, हेही चॅलेंज बघायचे असेल तर बघावे. मराठ्यांची दिशा आणि मराठ्यांचे वार कुठल्या दिशेने आहेत हे सरकारलापण कळत नाही. सत्तेचा राग डोक्यात ठेवून काम करत असाल, तर सत्ता येत असते आणि जात असते. पण मराठे कायमचे आयुष्यातून राजकीय सुपडासाफ करतील, असा सरकारमधील नेत्यांना जरांगे यांनी इशारा दिला आहे.

मी मरायला भीत नाही
दरम्यान पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, ‘अंतरवालीत काही चूक नसताना सरकारने प्रयोग केला. त्यामुळे आम्ही यावेळी सावध आहोत. आरक्षण असलेला आणि आरक्षण नसलेला मराठा एकत्र आला नाही, तर आरक्षण सोडून अनेक प्रश्न आहेत. त्यात जर दरी निर्माण झाली, तर पुन्हा ते कधीही एकत्रित येणार नाहीत. सरकार झोपी गेलंय का? त्यांना हे दिसत नाही का?, लेकरं मोठी करायची तर संघर्ष करावा लागणार आहे. मुंबईकरांनी तांब्याभरून पाणी द्यावं अशी अपेक्षा आम्हाला आहे. समाजासाठी थोडा त्रास सहन करावा, सर्व जाती-धर्मातील मुंबईच्या लोकांना हात जोडून अवाहन आहे, असेही जरांगे म्हणाले.

जरांगेंविरोधातील याचिकेची सुनावणी २४ जानेवारीला
मनोज जरांगे यांना मुंबईला येण्यापासून रोखा, अशी विनंती करणा-या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. अखिल भारतीय माळी समाजाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे आणि गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या दोन स्वतंत्र फौजदारी याचिकांची न्यायमूर्ती रेवते मोहिते-डेरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने २४ जानेवारीला सुनावणी निश्चित केली. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR