22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनाची पाटी बदलली

महाराष्ट्रात मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनाची पाटी बदलली

मुंबई : मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाची पाटी बदलण्यात आली आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दालनाची पाटी बदलली आहे. नवीन पाटी लावताच मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकारी पाहण्यासाठी येत होते. तसेच मंत्रालयात येणा-या लोकांसाठी हा उत्सुकतेचा विषय ठरला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाची पाटी आता ‘एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे’ अशी झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनाबाहेरील पाटी आता बदलण्यात आलेली आहे. शासनाने वडिलांच्या नावासोबत आईचे नाव लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीही या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आदिती तटकरे यांचा प्रस्ताव
राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी करत यापुढे व्यक्तीने शासकीय दस्तऐवजावर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे देखील बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वत:पासून करायची असे ठरवले.

एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आजपासून त्यांच्या मंत्रालयीन दालनाबाहेर लिहिलेल्या नावात बदल करण्यात आला असून ते ‘एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे’ असे करण्यात आले आहे. माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वत:च्या पायावर उभे करण्यात वडिलांच्या बरोबरीने आईचा देखील तेवढाच वाटा असतो. तिचे श्रेय तिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. समाजात वडिलांएवढेच आईचे महत्त्व देखील अधोरेखित व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी आता मुख्यमंत्र्यांनी स्वत:पासून सुरू केली आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR