नवी दिल्ली : भारतीय संस्कृतीचे जगभरात चाहते आहेत. विविधतेने नटलेल्या आपल्या देशाची ख्याती संपूर्ण जगभरात पसरली आहे. भारतीय संस्कृतीसोबतच इथली खाद्यसंस्कृती अनुभवण्यासाठी जगभरातील कानाकोप-यातून लोक आवर्जुन हजेरी लावतात.
भारतीय खाद्यपदार्थांची चव, त्यांचा सुगंध म्हणजे, स्वर्गसुख असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याचे संपूर्ण श्रेय जाते भारतातील मसाल्यांना. गेल्या अनेक शतकांपासून मसाल्यांचे माहेरघर म्हणून भारताची ओळख आहे. भारतीय मसाल्यांची बातच न्यारी, त्यांची चव आणि सुगंध सर्वांनाच भूरळ घालते. याच मसाल्यांमुळे भारताची खाद्यसंस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे.
भारतातही अनेक ठिकाणे आहेत, जिथे मसाले खास आहेत. त्यांच्यामध्ये असेच एक ठिकाण आहे, ज्याला देशातील मसाल्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. दक्षिण भारतातील कोझिकोडे येथून जगभरात मसाले निर्यात केले जातात. एवढेच नाहीतर दक्षिण भारताव्यतिरिक्त मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशातील काही मसाले जगभर प्रसिद्ध आहेत.
जगातील १०९ पैकी ७५ मसाले भारतीय
कदाचित हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आंतरराष्ट्रीय मानक संस्थेच्या यादीत जगभरातील तब्बल १०९ मसाल्यांचा समावेश होता. त्यापैकी ७५ मसाले हे भारताचे योगदान आहे.
मसाल्यांचा राजा कोझिकोडे!
केरळमधले कोझिकोडे मसाल्यांचा राजा म्हणून ओळखले जाते. या शहरात अनेक मसाल्यांचे उत्पादन घेतले जाते आणि एवढेच नाहीतर हे मसाले विदेशातही पाठवले जातात. इथे काळी मिरी, तेजपत्ता, वेलची, लवंग, दालचिनी, जायफळ आणि व्हेनिला पॉड यांसारख्या मसाल्यांचे उत्पादन घेतले जाते.
आंध्र प्रदेशातील मिरची सर्वात तिखट
आंध्र प्रदेश राज्य मिरचीचे सर्वाधिक उत्पादन करते. इथे अनेक प्रकारची लाल मिरची मिळते, ज्यामध्ये सर्वात तिखट मिरचीपासून कमी तिखट मिरच्यांचेही उत्पादन इथे घेतले जाते.
मध्य प्रदेशात धन्याचे सर्वाधिक उत्पादन
मसाल्यांच्या पदार्थांमध्ये आवर्जुन समावेश केले जाणारे धनेही फार महत्त्वाचे आहेत. मध्य प्रदेशातील मसालेही जगभरात प्रसिद्ध आहेत. विशेषत: इथे धन्यांचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते.
मुघल, ब्रिटिशांना ब्रिटिशांना मसाल्यांची भुरळ
भारतीय मसाल्यांचा वारसा शतकानुशतके जुना आहे, म्हणूनच मुघल आणि इंग्रजांनाही भारतीय मसाल्यांचे वेड होते. असे म्हटले जाते की, मसाल्यांचे खरे मूळ भारतात होते आणि इथून लोक परदेशात मसाले घेऊन जात असत.