नवी दिल्ली : आरबीआयने पेटीएम बँकेवर केलेल्या कारवाईनंतर पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आमचं नेमकं कुठे चुकलं हेच समजत नाही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम बँकेवर एवढी मोठी कारवाई कशी केली हेच समजत नाही असं विजय शेखर शर्मा म्हणाले. आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत एक मिटिंग घेतली. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
विजय शेखर शर्मा यांनी कॉन्फरन्स कॉल दरम्यान बोलताना कर्मचाऱ्यांनी त्यांनी नोकऱ्यांबाबत काळजी करण्याचे काही कारण नाही असा विश्वास दिला. तुम्ही सर्व पेटीएम कुटुंबाचा भाग आहात, कंपनी तुमची काळजी घेईल असं ते म्हणाले. विजय शेखर शर्मा व्यतिरिक्त, पेटीएमचे अध्यक्ष आणि सीओओ भावेश गुप्ता, पेटीएम पेमेंट्स बँकेचे सीईओ सुरिंदर चावला यांच्यासह सुमारे 900 कर्मचारी या कॉलमध्ये सामील होते.
मनी कंट्रोलच्या एका वृत्तानुसार, विजय शेखर शर्मा यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की, पेटीएम बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी कंपनीने अनेक बँकांशी संपर्क साधला आहे. पेटीएम सर्व नियमांचे पालन करेल. विजय शेखर शर्मा यांनी कर्मचाऱ्यांना दिलेला हा संदेश खूप महत्त्वाचा आहे. कारण पेटीएमसंबंधित एकामागून एक वाईट बातम्या येत आहेत. कंपनीच्या भवितव्यावर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
कंपनीचे शेअर्स आणखी 10 टक्क्यांनी घसरले
पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे. स्टॉक एक्स्चेंजमध्ये लोअर सर्किट 20 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर आले होते. सोमवारी ते आणखी 10 टक्क्यांनी घसरून 438.35 रुपयांवर बंद झाले. कंपनीचे मार्केट कॅप देखील 27,838.75 कोटी रुपयांवर घसरले आहे. पेटीएमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर दावा केला होता की त्यांचे ॲप 29 फेब्रुवारीनंतरही काम करत राहील. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला त्यांचे कामकाज बंद करण्यासाठी 29 फेब्रुवारी ही तारीख दिली आहे.