मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांची चर्चा जोरदार सुरू आहेत. महाविकास आघाडी विधानसभा निवडणुका लढणार आहे. दरम्यान, आता महाविकास आघाडीत छोटा भाऊ आणि मोठा भाऊ कोण यावरुन चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला.
मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, संजय राऊत आदी नेते उपस्थित होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, या निवडणुकीत मोठा भाऊ छोटा भाऊ असे काही चालणार नाही. प्रत्येक मतदारसंघात आम्ही बसून सर्वात चांगला उमेदवार कोणत्या पक्षात आहे बघून त्यांना उमेदवारी देणार आहे. मागच्या निवडणुकीचे संदर्भ घेऊन निर्णय घेऊ, आज आमची प्राथमिक बैठक झाली आहे, असे सांगत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जवळपास प्रत्येक मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रचार केला असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.