मुंबइ (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याची गरज असल्याचे सांगत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे केल्याने आघाडीत बिघाडी होते की काय, याची चर्चा सुरू झाली होती; पण स्वत: उद्धव ठाकरे यांनी मात्र आम्ही महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळी बाहेर आणू. महाराष्ट्र हाच महाविकास आघाडीचा चेहरा आहे, असे स्पष्ट करत वादावर पडदा टाकला. आमच्या चेह-याआधी महायुतीच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा आधी पुढे येऊ द्या, असा टोलाही त्यांनी लगावला.
विधानसभा निवडणुकीआधी महविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याची गरज असल्याचे संजय राऊत म्हणाले होते. या वरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीमध्ये बिघाडीला सुरुवात झाली आहे. संजय राऊत यांनी त्यात काडी टाकली आहे. आता ही आग कुठपर्यंत जाईल, याचा काही नेम नाही नसल्याची टिप्पणी केली होती. संजय राऊत यांना नेमका कोणाचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून हवा हे आधी त्यांनी ठरवायला हवे. त्यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून हवे असतील तर हा प्रस्ताव काँग्रेस स्वीकारेल, असे वाटत नाही.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात वज्रमूठ सभा झाल्या त्यात खुर्चीमधील बदल उद्धव ठाकरे यांना आवडत नव्हता त्यामुळे एक वेळेला आघाडी तुटेल; पण मुख्यमंत्र्यांचा चेहरा समोर येणार नाही, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावर आपण आता भाष्य करणार नाही त्यावर महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल, असे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी मात्र योग्य वेळी चर्चा होईल, असे सांगून वादावर पडदा टाकला.