मुंबई : महाविकास आघाडीच्या ४२ जागांचे वाटप झाले असून उमेदवारही निश्चित झाले आहेत. तर ६ जागांवर तिढा कायम आहे. हा तिढा लवकरच सोडवला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यासाठी ब-याच हालचालीदेखील मविआत घडत आहे.
महाविकास आघाडीची लोकसभेच्या जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करणारी बैठक, ५ किंवा ६ तारखेला होणार आहे. पण ४२ जागांवर मविआतल्या तिन्ही पक्षात एकमत झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्याची जागा वंचितसाठी सोडली जाणार तर हातकणंगलेची जागा राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली जाणार आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला पुन्हा इशारा देत आम्ही स्वतंत्र लढल्यास ६ जागा जिंकू शकतो असे म्हटले आहे. वंचितने २७ जागांची मागणी केली. त्यामुळे १-२ जागांवर समाधान होणार नाही, असे प्रकाश आंबेडकर सुचवू पाहत आहेत.