मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून सोबत आले तरी महाराष्ट्रातले राजकीय वातावरण अनुकूल होत नसल्याने भाजपाने आता मनसेलाही सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू केले असून मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज पुन्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी संभाव्य युतीबाबत मौन बाळगले असले तरी दिल्लीतील नेत्यांनी मनसेला स्थानिक पातळीवर सोबत घेण्यास अनुमती दिल्याची चर्चा आहे.
गेल्या काही महिन्यांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा राज ठाकरे यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी मनसेचे काही वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. आज आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर आशिष शेलार यांनी अधिक काही बोलण्याचे टाळले. राजकारणात नेत्यांच्या भेटी होत असतात. मी आणि राज ठाकरे व्यक्तिगत आयुष्यात मित्र आहोत तसेच राजकीय जीवनातही आमची मैत्री असल्यामुळे आम्ही भेटत असतो त्यामुळे अशा भेटींनंतर आम्ही साद घालायला गेलो होतो वगैरे बोलण्यात काही अर्थ नाही. या भेटीत मन की बात झाली, जन की बात झाली, महाराष्ट्र की बात झाली. अब बात चलेगी तो बहुत दूर तक चलेगी. या भेटीत काय झालं त्याचा खुलासा योग्य वेळी केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपण्यास विरोध करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांच्या भेटीबद्दल बोलण्यास नकार दिला. आजची पत्रकार परिषद दुस-या कारणासाठी आहे, असे सांगत त्यांनी राजकीय प्रश्न टोलावले.