मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नुकतीच मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी विधानसभा निवडणूक महायुतीतूनच लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर यावेळी राष्ट्रवादी ८५ जगांवर लढणार असल्याची विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष किती जागा लढवणार यावरून रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेचे काही नेत वेगवेगळ्या प्रकारचे दावे करत होते. त्यामुळे महायुतीतच संभ्रम निर्माण झाला होता. आता अजित पवार यांच्या पक्षाच्या बैठकीत ८५ जगा लढविण्याचा निर्णय झाल्याने तिन्ही पक्षातील नेत्यांचे दावे हवेतच विरल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या पक्षाच्या बैठकीत ८५ जागा लढविण्याचा निर्णय झाला असला तरी महायुतीतील भाजप आणि शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभेसाठी २८८ जागा
राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. त्यातील राष्ट्रवादीने ८५ लढवल्या तर २०३ जागा उरतात. सध्या राज्यात भाजपचे १०६ आमदार आहेत. याबरोबर सुमारे दहा अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. त्यामुळे राहिलेल्या २०३ जगांमधील ११५-१२० जागा भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उरलेल्या ८०-८५ जगांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष तयार होतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वादग्रस्त विधाने टाळण्याच्या सूचना
अजित पवार यांचे शासकीय निवस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत पदाधिकारी, प्रवक्ते आणि आमदारांनी मित्र पक्षांबाबतची वादग्रस्त विधाने टाळण्याची सूचना देण्यात आली आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी, भाजप-राष्ट्रवादी यांच्यातील नेते, पदाधिका-यांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली आहे. त्यामुळे राज्यात महायुती टिकणार की नाही अशी चर्चा सुरू झाली होती.