पुणे : प्रगत तंत्रज्ञानामुळे आर्थिक व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. डिजिटल माध्यमातून आर्थिक व्यवहार करताना अनेकदा फसवणूक, तसेच सायबर चोरट्यांकडून लूट होते. हे टाळण्यासाठी सामान्य नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी ‘आयसीएआय’ने पुढाकार घेतला असून, देशभरात आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे, अशी माहिती दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) अध्यक्ष सीए अर्पित काबरा यांनी सांगितली.
नागरिकांमधील अर्थसाक्षरतेसाठी आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. लेखापालन पुरातन काळापासून अस्तित्वात असून, त्याच्या बदलत्या स्वरूपाचे दर्शन घडवणारे संग्रहालय विविध महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. विदेशात जाणा-या सीएची संख्या वाढत आहे. नवतंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. या सर्व गोष्टींना जुळवून घेता यावे, यासाठी सीए सभासदांकरिता नियमित उपक्रम राबवले जात आहेत, असे ते म्हणाले.
सीए चितळे म्हणाले, बदलत्या काळानुसार सीए अभ्यासक्रमात बदल होत आहेत. विषयांची संख्या सहा, तर मे २०२४ पासून सीए आर्टिकलशीपचा कालावधी तीन वर्षांऐवजी दोन वर्षांचा करण्यात आला आहे. यामुळे कमी वयात विद्यार्थ्यांना सीए होता येईल. उद्योग क्षेत्राचा विस्तार पाहता मोठ्या प्रमाणात लेखापाल व सनदी लेखापाल लागणार आहेत.