अहमदनगर : प्रतिनिधी
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आदर्शवत आहे. त्यामुळे राज्यभरातील मुलींच्या वसतिगृहांना अहिल्यादेवींचे नाव देण्यात येणार असून, सर्व सरकारी दस्तावेजांमध्ये अहिल्याबाईऐवजी ‘अहिल्यादेवी’ असा उल्लेख केला जाणार आहे. तसेच धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चौंडी (ता. जामखेड) येथे केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९९ वा जयंती उत्सव चौंडी येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री अतुल सावे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, आमदार राम शिंदे, ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.
‘आमदार राम शिंदे व गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष केला. परंतु जेव्हा आम्ही सरकार पालटून टाकले त्यानंतरच नाव बदलले. आता आदिवासी समाजाच्या २२ योजनांचा लाभ धनगर समाजाला दिला जात आहे. धनगर समाजाच्या युवकांना उद्योग व्यवसाय सुरू करता यावेत यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे धर्तीवर स्वतंत्र महामंडळ सुरू केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.