भिवंडी : शहरात पावसाळ्यात धोकादायक इमारत दुर्घटनांचा काळा इतिहास पाहता त्यामध्ये खंड पडताना दिसत नाही. शहरातील नारपोली गावाच्या हद्दीत शुक्रवारी एका चाळीतील घराची भिंत व छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विमल विशेसर साह (वय ३५ वर्षे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नारपोली गावात राजाराम पाटील चाळ असून या चाळीच्या खोलीत विमल साह हा राहत होता.अचानक खोलीची भिंत व छत कोसळली त्यावेळी खोलीत असलेला विमल याच्या अंगावर हा ढिगारा पडल्याने त्या ढिगा-याखाली दाबला गेल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.
या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली परंतु घटनेला २४ तास उलटून गेले तरी या घटनेची नोंद पालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष अथवा स्थानिक प्रभाग समिती क्रमांक चार येथे नव्हती हे दुर्दैव आहे. या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.