मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने सुरू असून ३१ जानेवारीनंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस सुरू राहावी, अशी मागणी होत आहे. त्या मागणीच्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी ७ दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
लातूर जिल्ह्याचे खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाले असून शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांची वाढीव उद्दिष्ट देण्याची मागणी लक्षात घेता लातूर जिल्ह्यासाठी आता २० हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदीच्या वाढीव उद्दिष्टालाही मंजुरी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यासाठी या पूर्वी १० हजार मेट्रिक टनाचे वाढीव उद्दिष्ट मंजूर करण्यात आले होते.
राज्यात ३१ जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत देण्यात आली आहे. राज्यात नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून ५६२ खरेदी केंद्रांवर २५ जानेवारीपर्यंत ७ लाख ८१ हजार ४४७ मेट्रिक टनांपेक्षा अधिक सोयाबीनची खरेदी झालेली आहे. ३१ जानेवारीपर्यंत या आकड्यात मोठी वाढ होणार आहे. अनेक जिल्ह्यांनी आपले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. लातूर जिल्ह्याने आपले पीपीएस खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण केले असून १ लाख २८ हजार ४१७ मेट्रिक टन खरेदी पूर्ण झालेली आहे. काही शेतक-यांचे सोयाबीन खरेदी करणे बाकी असल्याने तेथील लोकप्रतिनिधी व शेतकरी यांच्या मागणीनुसार आता लातूर जिल्ह्यासाठी वाढीव २० हजार मेट्रिक टनांसह एकूण ३० हजार मेट्रिक टनांचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे.
शेतक-यांचे हित लक्षात घेऊन १२ जानेवारीपर्यंत होणा-या सोयाबीन खरेदीला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांना विनंती करून ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळविली होती. आता पुन्हा राज्यातील शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता राज्यात ३१ तारखेनंतर ७ दिवस सोयाबीन खरेदीची मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.