छ. संभाजीनगर : जालना-मुंबई हाय स्पीड ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ उद्घाटन सोहळा वादाचा ठरला आहे. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन येथे एमआयएम आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आलेले पाहायला मिळाले. खासदार इम्तियाज जलील यांचे संभाजीनगर स्टेशनमध्ये आगमन झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी केली. तर, पोलिसांनी एमआयएमच्या कार्यकर्त्यांना रेल्वे स्टेशनबाहेर काढले.
जालना-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून तिचे उद्घाटन पार पडेल. पण, उद्घाटन पत्रिकेत नाव नसल्याचे नाराजी नाट्य समोर आले आहे. इम्तियाज जलील यांनी आमंत्रण न मिळाल्याने आणि पत्रिकेत नाव नसल्याने भाजपवर टीका केली.
त्यातच छत्रपती संभाजीनगर येथे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे आगमन होणार होते. त्यापूर्वी इम्तियाज जलील हे रेल्वे स्थानकावर पोहोचले. तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी केली. तर, एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जलील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
जलील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, ‘लोकशाही मार्गाने माझा निषेध दर्शवण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणत्याही प्रकारचा कायदा आम्ही हातात घेतला नाही. भाजपाने हा रेल्वेचा कार्यक्रम न ठेवता पक्षाचा कार्यक्रम केला आहे. सगळ्यांचीच नावे वगळण्यात आली आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त ‘मोदी-मोदी’ हेच काम यांना राहिले आहे. पोलिसांनी बळजबरीने माझ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले.’’
‘रेल्वे स्टेशन भाजपाची मालमत्ता नाही’
‘माझ्या कार्यकर्त्यांनी मुंबईला जाताना रेल्वे थांबवली, तर याची जबाबदारी पोलिसांची असेल. आमच्या लोकांना बाहेर काढण्यात येत असेल, तर भाजपाच्या लोकांनाही बाहेर काढा. रेल्वे स्टेशन भाजपाची मालमत्ता नाही,’’ अशी टीका जलील यांनी केली आहे.
ज्यांचे सरकार त्यांचे श्रेय : भुमरे
पालकमंत्री संदीपान भुमरेंनी म्हटले, ‘संभाजीनगरला सुसज्ज अशी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ मिळाली आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. प्रोटोकॉलनुसार रेल्वे विभागाने पत्रिकेत नावे टाकली असतील. पत्रिकेत कुणाचे नाव आहे-नाही, हे मी पाहिले नाही. ज्यांचे सरकार असते ते श्रेय घेण्याचे काम करते. जलील विरोधी पक्षाचे काम करतात.’