मुंबई : राजकीयदृष्टया कालचा दिवस चांगलाच गाजला. एकीकडे लोकसभेच्या अधिवेशनात खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या तुफान फटकेबाजीनंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. तर दुसरीकडे राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते अंबदास दानवे-प्रसाद लाड यांच्यातील तू-तू-मै-मैमुळे राज्यात देखील चर्चेला उधाण आले आहे. या घटना काल घडल्या मात्र, आज दुस-या दिवशीही विधानभवनात त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.
या विरोधात भाजप आमदारांनी आक्रमक भूमिका घेत विधानभवानाच्या पाय-यांवर राहुल गांधी आणि अंबादास दानवे यांच्या विरोधात आंदोलन करत घोषणाबाजी सुरू केली आहे. हिंदूंचा अपमान सहन करणार नाही, अशा आशयाचे फलक झळकवत राहुल गांधी यांच्याविरोधात सत्ताधा-यांनी आंदोलन सुरु केले आहे.
सोमवारी संसदीय अधिवेशनात खासदार राहुल गांधी भाजपवर जोरदार टीका केली. अधिवेशनात बोलताना राहुल गांधी यांनी हिंदूू धर्माचा संदर्भ देत भाजपवर हल्लाबोल केला होता. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे सभागृहात एकच गोंधळ झाला. सत्ताधा-यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
राहुल गांधी यांनी हिंदू धर्मावर केलेल्या वक्तव्याचे महाराष्ट्र विधीमंडळातही पडसाद उमटले. महाराष्ट्र विधीमंडळात भाजप आमदारांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हिंदूंचा अपमान सहन करणार नाही, अशा आशयाचे बॅनर भाजप आमदारांनी हातात घेत पाय-यांवर आंदोलन केलं. तसेच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदमध्ये विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दानवेंनी राजीनामा द्यावा
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी करत प्रसाद लाड म्हणाले, दानवे यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला पाहिजे. विरोधी पक्षनेत्याचं निलंबन झाले पाहिजे. त्यांनी माझी नाही, तर माझ्या आईची माफी मागितली पाहिजे. प्रत्येक गुन्हेगारांमध्ये अहंकार निर्माण झाला आहे. माझं मत आहे की, सरकारच्या निर्णयाशी सहमत राहील. पण राजीनामा मागितला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी त्यांना जाब विचारला पाहिजे. त्यांना शिक्षा केली पाहिजे असेही पुढे लाड यांनी म्हटले आहे.