22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यभरात पावसाचा धुमाकूळ

राज्यभरात पावसाचा धुमाकूळ

अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

पुणे : प्रतिनिधी
राज्यात गुरुवारी सर्वत्र पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक शहरांमधील पाणी वस्त्यांमध्ये घुसले आहे. नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. नदीकाठावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. काही धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. मुंबई, पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिला आहे. एकंदरीत राज्यातील पावसाचा मोठा परिणाम जनजीवनावर झाला आहे.

ठाणे जिल्ह्यातील शाळा बंद
पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहणा-या उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. कल्याण-नगर मार्गावरील रायते पुलाला नदीचे पाणी लागले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास उल्हास नदीच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कल्याण-नगर मार्गावरील रायते पुलावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून या भागातील नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत तर जोरदार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर येथील घाटमाथ्यावरील शाळांना जिल्हाधिका-यांनी सुटी जाहीर केली आहे. सांगली, ठाणे जिल्ह्यातील शाळांनाही सुटी दिली गेली आहे.

वर्धा नदीला पूर, महामार्ग बंद
सातपुडा पर्वतात बेतूलजवळच्या मुलताई येथे उगम पावणा-या वर्धा नदीला पूर आला आहे. यामुळे राळेगाव-वरोरा महामार्ग बंद झाला आहे. वाहतूक ठप्प झाली आहे. पुलावरून ४ फूट पाणी वाहत आहे. चिंच मंडल, दापोरा येथील नदीकाठच्या शेतात पाणी शिरले आहे. सततच्या पावसामुळे गोंदियातील बांध तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. तलावाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले आहे.

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग
सांगली जिल्ह्यातील सर्व भागात पावसाची संततधार सुरू आहे. गेले ८ दिवस नॉन स्टॉप पावसाची बॅटिंग सुरू असल्यामुळे वारणा आणि कोयना पाणलोट परिसरात सतत पाऊस सुरू आहे. चांदोली आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या सांगली कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी ३१ फूट ८ इंच आहे.

कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली
पंचगंगा नदीने धोका पातळी गाठल्यानंतर आता नदीकाठच्या गावांना फटका बसायला सुरुवात झाली आहे. आंबेवाडीतून चिखलीकडे जाणा-या रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर आंबेवाडी आणि चिखली या दोन्ही गावांना सर्वाधिक फटका बसत आहे.

बदलापूरच्या बारवी धरणक्षेत्रात दमदार बॅटिंग
मागील २४ तासांत वरुणराजाने बदलापूरच्या बारवी धरणक्षेत्रात दमदार बॅटिंग केली आहे. मागील २४ तासांत तब्बल १५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे कालपर्यंत ५४ टक्क्यांवर असलेला बारवी धरणाचा पाणीसाठा आज ६१ टक्क्यांवर गेला आहे. धरणाच्या पाणी पातळीत २ मीटरने वाढ झाली असून आता धरण भरण्यासाठी ५ मीटर उंची शिल्लक आहे. पावसाचा हा जोर कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत बारवी धरण भरण्याची शक्यता आहे.

मुंबईसाठी यलो अलर्ट
मुंबईच्या उपनगरीत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. इस्टर्न हायवे, वेस्टर्न हायवे वाहतूक ठप्प झाली आहे. ‘मॅक्सिमम सिटी’ मुंबईच्या अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, पुण्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR