पुणे : प्रतिनिधी
बदलत्या सामाजिक परिस्थितीचा परिणाम अनेक घटकांवर होत आहे. परिणामी मराठी नाटकांना प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी मिळत आहे. नाटक हे अतिशय प्रभावी माध्यम आहे, नवीन लेखकांनी नाटकांमध्ये नावीन्यपूर्ण विषय आणले पाहिजेत, त्यामध्ये आजचे सामाजिक बदल प्रतिबिंबित झाले पाहिजेत, असा सूर शुक्रवारी (५ जानेवारीच्या) परिसंवादात उमटला.
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्यानिमित्त ‘नाटक माझ्या चष्म्यातून’ हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. खासदार श्रीनिवास पाटील, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, माजी आमदार उल्हास पवार, सामाजिक कार्यकर्ते युवराज शहा, पुणे ग्रामीण पोलिस सहअधीक्षक मितेश घट्टे सहभागी झाले होते. त्यांच्याशी राजेश दामले यांनी संवाद साधला.
खासदार पाटील म्हणाले, मराठी नाटकांना मोठी परंपरा आहे. अनेक नाटकांनी सामाजिक परिवर्तनात मोलाची भूमिका बजावली आहे. आज नवीन लेखकांनी नाटकांमध्ये नावीन्यपूर्ण विषय आणले पाहिजेत, त्याशिवाय प्रेक्षक वाढणार नाहीत.
माजी आमदार पवार म्हणाले, मामा वरेरकर यांनी ८० वर्षांपूर्वी आपल्या नाटकातून मांडलेले प्रश्न आजही कायम आहेत. नाटक हे परिवर्तनाचे माध्यम आहे, त्यात सातत्याने प्रयोग झाले पाहिजे, त्याशिवाय प्रेक्षक पुन्हा नाटकाकडे वळणार नाहीत याचा लेखकांनी विचार केला पाहिजे
युवराज शहा म्हणाले, मराठी नाटकांनी कायम सामाजिक परिवर्तन केले आहे. आजही त्यात चांगले प्रयोग होत आहेत, त्याला आर्थिक पाठबळ मिळाले पाहिजे.