सोलापूर : महायुतीमध्ये सोलापूर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) मिळावा, यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. शिर्डीतून मी उमेदवार असेन आणि सोलापूर लोकसभेसाठी राजाभाऊ सरवदे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, असे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्या वेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची भूमिका काय असणार, याबाबत आठवले यांनी भाष्य केले. ते म्हणाले, येत्या काळात लोकसभा निवडणुका आहेत, एनडीएला 400 जागा मिळतील. एनडीएला 2014 पेक्षा जास्त जागा 2019 ला मिळाल्या आहे. विविध राज्यांतील निवडणुकांतही भाजप पुढे आलेले आहे.
रिपब्लिकन पक्षाला राज्यात मंत्रिपद मिळावे, अशी आमची मागणी होती. पण, विस्ताराच्या आधीच अजित पवार आले. अजूनही वेळ गेलेली नाही. आम्हाला राज्यात मंत्रिपद मिळेल, असे सांगून आठवले म्हणाले, सोलापूर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला मिळावा, ही आमची मागणी आहे. त्या संदर्भात मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आहे. शिर्डी लोकसभेत मी उमेदवार असेन आणि सोलापूर लोकसभेसाठी राजाभाऊ सरवदे यांना उमेदवारी देण्यात यावी.