22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रदहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार १० मिनिटांचा जास्त वेळ

दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार १० मिनिटांचा जास्त वेळ

पुणे : दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दहावी-बारावी बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. दहावी) परीक्षा देणा-या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत.

अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत पालक, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दिली जाणार आहेत.

फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षांच्या वेळी सकाळच्या सत्रात सकाळी ११.०० वाजता तसेच दुपारच्या सत्रात दु. ३.०० वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल. सकाळच्या सत्रात स. १०.३० वाजता तसेच दुपारच्या सत्रात दु. २.३० वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षांसाठी खालीलप्रमाणे वेळ वाढवून देण्यात येणार

परीक्षेची सुधारित वेळ
सकाळी ११ ते दुपारी २
सकाळी ११ ते दुपारी २:१०
सकाळी ११ ते दुपारी १
सकाळी ११ ते १:१०
सकाळी ११ ते दुपारी १.३०
सकाळी ११ ते दुपारी १.४०

बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते २३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा १ मार्च २०२४ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR