अकोला : लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही, त्यात मराठवाड्यात भाजपचा मोठा पराभव झाला. मराठवाड्यातील 8 पैकी केवळ 1 जागेवर महायुतीचा उमेदवार विजयी झाला असून मराठवाड्यातील भाजपच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे, राज्यातील भाजपच्या पराभवाचा विश्लेषण करताना भाजपकडून विविध कारणे देण्यात आली. त्यात, खोटा नेरेटीव्ह हे सर्वात महत्वाचं कारण सांगण्यात आलं. तर, मराठवाड्यातील पराभवावर अप्रत्यक्षपणे मराठा आरक्षणाचा फटका बसल्याचेही काही नेत्यांनी म्हटले. मात्र, माजी केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते भागवत कराड यांनी थेट कबुलीच दिली. मराठवाड्यात जरांगे फॅक्टर चालला, असे म्हणत कराड यांनी मनोज जरांगेंमुळे मराठवाड्यात भाजपचा पराभव झाल्याचं म्हटलं.
मराठवाड्यातील बहुतांश विजयी उमेदवारांनी विजयानंतर मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला आपलं समर्थन दिलं. तर, बीडचे बजरंग सोनवणे आणि परभणीचे संजय (बंडू) जाधव यांनी आपल्या विजयात मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा वाटा असल्याचे म्हटले. तर, दादा, तुम्ही मला खासदार केला, तुमच्यामुळेच मी खासदार झालो, असे म्हणत बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगेंचे आभारही मानले होते. आता, भाजप नेते आणि माजी केंद्रीयमंत्री भागवत कराड यांनीही स्पष्ट कबुली दिली आहे. बाकीच्या विभागात माहिती नाही, पण मराठवाड्यात महायुतीच्या पिछेहाटीसाठी जरांगे फॅक्टर कारणीभूत ठरल्याची स्पष्टोक्ती माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आणि भाजपाचे खासदार डॉ.भागवत कराड यांनी दिली. ते अकोला येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी डॉ. कराड अकोल्यात आले होते. विधानसभा निवडणुकीआधी जरांगे आणि मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक निर्णय करणार असल्याचंही यावेळी डॉ. कराड यांनी सांगितले.