कुर्डुवाडी / प्रतिनिधी
कुर्डुवाडी शहरातील मध्यवर्ती गेट क्रमांक ३८ वरील उड्डाणपुलासाठी होणारा विलंब व नागरिकांची गरज पाहून रेल्वे प्रशासन आता स्वतःच्या जागेतून भुयारी मार्ग काढून देण्याच्या तयारीत आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी कुर्डुवाडी येथील सदर जागेची पाहणी केली आहे. सदर भुयारी मार्गाचा नकाशा ही तयार करण्यात आला आहे.
वरिष्ठांची परवानगी मिळताच लवकरच हा भुयारी मार्ग पूर्ण करण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. कुडुवाडी शहरातील गेट नं. ३८ हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून सदर प्रश्नी नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची असणारी डोळेझाक यामुळे सुमारे १४ वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. नगरपालिका प्रशासनाकडून कोणताच तोडगा निघत नसल्याने अखेर रेल्वे प्रशासनाने दि.२ ऑगस्ट २०१९ च्या मध्यरात्रीपासून सदर रेल्वे गेट बंद केले ते आजही कायमस्वरूपी बंदच आहे. यामुळे कुडुवाडी शहराची विभागणी होऊन या शहराचे दोन भाग निर्माण झाले आहेत.
२०१९ पासून रेल्वेने कायमस्वरूपी हे गेट बंद केले. यालाही पाच वर्षाचा कालावधी उलटून गेला पण ना प्रशासन ना लोकप्रतिनिधी यांनी या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष दिले. उद्योग व्यवसायाला येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन रेल्वेच्या जागेतून नागरिकांसाठी भुयारी मार्ग देण्याचे निश्चित केले आहे. बार्शी रोड कडून बालोद्यानच्या मागून पोलीस ठाण्याच्या समोर हा भुयारी मार्ग येऊन मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांची सोयही होणार आहे.
रेल्वे गेट बंद झाल्यामुळे व्यापार पेठेवर मोठा परिणाम झाला आहे. रेल्वे गेटवरून उड्डाणपूल होणे गरजेचे होते मात्र, गत पाच वर्षात यावर कोणतीच करवाई झाली नाही. आता होणारा भुयारी मार्ग पर्याय म्हणून स्वीकारणे सर्व हिताचे ठरेल. भविष्यात उड्डाण पुलासाठी ही प्रयत्न करावे.असे किराणा व्यापारी असोसिएशन कुर्डुवाडीचे अध्यक्ष राजकुमार धोका म्हणाले.