भोपाळ : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षानंतर आता जयंत सिंह यांच्या नेतृत्वाखालील आरएलडी पक्षही इंडिया आघाडीतून बाहेर पडला आहे. अशातच मध्य प्रदेशातहीकाँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र आज कमलनाथ यांनी काँग्रेसच्या विचारधारेबाबत पोस्ट लिहीत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
काँग्रेस नेते कमलनाथ यांनी आज एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की काँग्रेसची विचारधारा सत्य, धर्म आणि न्यायाची विचारधारा आहे. देशातील सर्व धर्म, जाती, प्रदेश, भाषा आणि विचारांना काँग्रेसच्या विचारधारेत समान स्थान आहे. काँग्रेसच्या १३८ वर्षांच्या इतिहासातील बहुतांश काळ हा संघर्ष आणि सेवेत गेला आहे. स्वातंर्त्याच्या आंदोलनावेळी हुकूमशाहीविरोधात संघर्ष करण्यासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये स्पर्धा लागली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रनिर्माण करणे हेच काँग्रेसचे एकमेव ध्येय आहे.
आज जेव्हा देशात विरोधी पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे. तेव्हा काँग्रेसचीच विचारधारा हुकूमशाहीचा विरोध करणार आहे आणि देशाला जगातील सर्वांत सुंद आणि मजबूत लोकशाही बनवणार आहे. आम्ही गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांच्या मार्गाने चालत बलशाली भारत निर्माण करू अशा शब्दांत कमलनाथ यांनी काँग्रेसच्या विचारधारेचा पुरस्कार केला आहे.