अहमदनगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुधवारी बुडून मृत्यू झाला. सागर पोपट जेडगुले (वय २५, रा. धुळवड, ता. सिन्नर) आणि अर्जुन रामदास जेडगुले (वय १८, रा. पेमगिरी, ता. संगमनेर) अशी त्यांची नावे आहेत. या मुलांच्या शोधासाठी एसडीआरएफचे जवान गुरुवारी सकाळी पोहोचले होते. सकाळी त्यांनी मुलांचा शोध सुरू केल्यानंतर त्यांची बोट बुडाली. या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे.
तसेच दोन जवानांचा शोध सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयात प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली होती. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला असताना अहमदनगर जिल्ह्यात तीन जवान आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांचा शोध एसडीआरएफ जवानांनी सुरू केला होता. परंतु धरणातून पाणी सोडलेले असल्यामुळे नदीच्या प्रवाहात पाण्याचा वेग प्रचंड होतो. यामुळे जवानांची बोट उडाली. यामध्ये तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह मिळाले आहेत. तसेच दोघांचा शोध सुरू आहे.
या बोटीत एसडीआरएफचे ४ जवान आणि १ स्थानिक नागरिक होता. अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळच ही घटना घडली आहे. जे जवान वाचवण्यासाठी आले, त्यांचाच मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यावर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या. प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दोन जणांच्या शोधासाठी सुरू असलेल्या प्रयत्नाची माहिती बाळासाहेब थोरात यांना दिली.