23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeपरभणीट्वेन्टीवन शुगर्स. ली. चे ५ लाख मे. टन ऊसाचे विक्रमी गाळप

ट्वेन्टीवन शुगर्स. ली. चे ५ लाख मे. टन ऊसाचे विक्रमी गाळप

परभणी : टवेन्टिवन शुगर्स सायखेडा ता. सोनपेठ जि. परभणी येथील साखर कारखान्याकडून चालू गळीत हंगाम २०२३-२०२४ साठी गाळप झालेल्या ऊसाला २ हजार ५०० रूपये रक्कम अदा करण्यात आली आहे. तर अंतीम ऊस दर प्रतिटन २ हजार ७०० रूपये देण्याचा निर्णय झाला आहे. ऊस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर गाळप झालेल्या ऊसबीलाची उर्वरीत रक्कम प्रतिटन रुपये २०० लवकरच अदा करण्यात येणार आहे. गळीत हंगाम प्रगतीपथावर असून या हंगामात ५ लाख १६ हजार ८१७ मे. टन पेक्षा अधिक ऊसाचे गाळप करीत कारखान्याने विक्रमी गाळप केले आहे.

मराठवाडयातील परभणी, बीड जिल्हयातील विशेषत: सोनपेठ, पाथरी, पालम, गंगाखेड, पूर्णा, परळी, माजलगाव, धारूर या भागातील ऊस उत्पादक शेतकरी, शेतीपूरक व्यावसायीक, बेरोजगार युवकांसाठी या भागात साखर उद्योग सुरू करणे गरजेचे होते. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. अमित विलासराव देशमुख यांनी हा विचार करून टवेन्टिवन शुगर्स देवीनगर सायखेडा येथे सुरू केला. हा कारखाना प्रामुख्याने परभणी व बीड जिल्ह्यातील शेतक-यांच्या ऊसाचे गाळप व्हावे, साखर कारखानदारीच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात आर्थिक बदल व्हावा यासाठी कारखाना सुरू केला आहे. परभणी जिल्हयात टवेन्टिवन शुगर्स कारखाना नजीक ऊसाचे क्षेत्र मोठया प्रमाणात आहे. टवेन्टिवन शुगर्स कारखाना सुरू झाल्यामुळे शेतक-यांना ऊसाचे गाळप वेळेवर करणारा हक्काचा कारखाना मिळाला आहे. शेतक-यांचा ऊस गाळपावीना शिल्लक राहू नाही याची हमी मिळाली आहे.

ट्वेन्टीवन शुगर्सची ऊस गाळपात आघाडी
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी साखर कारखाना परीवारात हा साखर कारखाना दाखल झाल्या नंतर पहील्या हंगामापासूनच सर्व हंगामात ऊसाचे गाळप चांगले झाले आहे. ऊस उत्पादक शेतक-यांना या माध्यमातून ऊस दराची शाश्वती मिळाली आहे. टवेन्टिवन शुगर्स, सायखेडा कारखान्याचा चौथा गळीत हंगामाची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. पहील्या गळीत हंगामानंतर साखर कारखान्याचे आधुनीकीकरण आणि विस्तारीकरण करण्यात आले आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढल्याने अधिकाधिक ऊसाचे वेळेवर गाळप करणे शक्य झाले आहे. गळीत हंगाम प्रगतीपथावर असून या हंगामात ५ लाख १६ हजार ८१७ मे. टन पेक्षा अधिक ऊसाचे गाळप झाले आहे.

आधुनिक ऊस विकासाला चालना
ट्वेन्टीवन शुगर्स कार्यक्षेत्रात पाण्याची उपलब्धता चांगली आहे. शेत जमिनीचा पोत चांगला आहे आणि शेतकरी कष्टाळू आणि प्रयोगशील आहे. यामुळे ऊस उत्पादकांना आधुनीक ऊस शेती अवगत करण्यासाठी कारखान्याकडून ऊस विकास संशोधन आणि मार्गदर्शन कार्यप्रणाली राबविण्यात येणार आहे. कारखान्याकडून ऊस विकास मेळावा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, ऊसाचे विविध वाणाची लागवड व्हावी याकरीता टिश्यू कल्चर रोप पुरविण्यासाठी नर्सरी सुरू केली आहे, चांगल्या प्रतीच्या ऊसाची लागवड वाढावी यासाठी आडसाली योजना सुरू केली आहे. पथदर्शी शेतक-याची निवड करून ५० एकर क्षेत्रावर संस्कार प्लॉट योजना राबवीली आहे. या सर्व योजनांना सभासद व ऊस उत्पादकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे.

ऊस शेती यांत्रीकीकरणास प्राधान्य
साखर उद्योगासमोर ऊस लागवड, ऊस तोडणी, ऊस वाहतूक, कारखाना गाळप प्रक्रीयेसाठी साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतक-यांनाही शेतीसाठी मजूरांची कमतरता भासत आहे. यातून ऊस शेती मधील उत्पादन खर्च वाढत आहे. यावर उपाययोजना म्हणून ट्वेन्टीवन शुगर्स ऊस शेती यांत्रीकीकरणाला प्राधान्य देणार आहे. ऊस शेतीमध्ये हार्वेसटर, मीनी ट्रॅक्टर, ऊस लागवड यंत्र माध्यमातून यांत्रीकीकरणास चालना देण्यात येणार आहे. ऊसाची उपलब्धता आणि गुणवत्ता गळीत हंगाम सुरू होण्या अगोदरच समजण्यासाठी डीजटलायझेशन आणि मॅपींग कार्यप्रणाली विकसीत करण्यात येणार आहे.

जास्तीत जास्त ऊस ट्वेन्टीवन शुगर्सला गाळपासाठी द्यावा
सध्या आसवनी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून ऊसउत्पादक शेतक-यांना येणा-या काळात चांगला भाव देता यावा यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. या गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाला पहीला हप्ता प्रतिटन २ हजार ५०० रुपये अदा करण्यात आला आहे. तर लवकरच उर्वरीत रूपये २०० प्रति टन प्रमाणे रक्कम अदा करण्यात येणार आहे. यामुळे या भागातील सभासद, ऊस उत्पादकांनी आपला जास्तीत जास्त ऊस ट्वेन्टीवन शुगर्सला द्यावा असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR