36.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस

राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस

शेतक-यांसमोर पुन्हा संकट

कोल्हापूर : हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसाचा फटका शेतक-यांना बसला आहे. भात आणि द्राक्षाला या अवकाळीचा फटका बसणार आहे. परंतु रबी हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पलूस तालुक्यात अंकलखोप या गावी रात्री वादळी वा-यासह तुफान पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे.

मंगळवारी रात्री वातावरणात बदल होऊन अचानक पाऊस सुरू झाला. या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक शेतक-यांचा ऊस शेतामध्येच अडकला आहे. त्याचबरोबर द्राक्ष बागायतदारांना सुद्धा या पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. बुधवारी सांगली जिल्ह्यातील वातावरण ढगाळ आहे. जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस भागात पहाटेपासून अवकाळी पाऊस तर जत तालुक्यातील उमदी भागात देखील पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांसह अन्य पिकांवर रोगाचा धोका आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार
कोल्हापूरच्या राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात बुधवारी पहाटे जोरदार पाऊस बरसला. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शेतक-यांनी मळणीसाठी भात पीक शेतात ठेवले होते. त्याचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी सायंकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR