23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात कडाक्याच्या थंडीसोबत अवकाळी पावसाचा इशारा

राज्यात कडाक्याच्या थंडीसोबत अवकाळी पावसाचा इशारा

उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट नाशिकमध्ये ४.४ अंश सेल्सिअस किमान तापमान

पुणे : राज्यात गेल्या काही चार-पाच दिवसांपासून वातावरण बदलले आहे. राज्यात कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. राज्यातील अनेक शहरांचा पारा दहा अंशाच्या खाली आला आहे. यावेळी शेतक-यांसमोर संकट निर्माण करणारी परिस्थिती आहे. राज्यात थंड वारे वाहत असताना अवकाळी पावसाचे संकट आले आहे. कोकणात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. नाशिक जिल्ह्यात यंदाच्या हिवाळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.

दरम्यान, राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहेत. तापमानात देखील चढ उतार होत आहे. त्याचवेळी हवामान खात्याने कोकणात अवकाळी पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतक-यांसह आंबा बागायतदार पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार पुढील ४ ते ५ दिवसात दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पारा घसरल्याने राज्यातील काही भागांत थंडीची लाट आली आहे. बोच-या आणि कडाक्याच्या थंडीमुळे मॉर्निंग वॉक करणा-यांची संख्या कमी झाली आहे. अचानकच आलेल्या थंडीमुळे राज्यातील नागरिकांना हुडहुडी भरली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट आली आहे.

निफाड तालुक्याचा पारा घसरला
नाशिकमधील निफाड तालुक्याचा पारा घसरला आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रामध्ये निफाडमध्ये ४.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. या हिवाळ्यातील हा तापमानाचा नीच्चांक आहे. थंडीमुळे द्राक्षांना तडे तसेच द्राक्ष फुगवणीवर परिणाम होणार आहे. वाढत्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आले आहे.

धुळे शहराचा तापमान ४.६ अंश सेल्सिअस
धुळे शहराचा जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका जाणवत आहे. जिल्ह्यात कमाल तापमान ४.६ अंश सेल्सिअसवर गेला आहे. तर जळगाव जिल्हा सुध्दा गारठला आहे.

पुणेकरांना हुडहुडी
पुण्यात कडाक्याची थंडी पडली असून पुणेकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. हवेतील गारठा वाढल्याने पुण्यातील किमान तापमान ७ अंशावर आले आहे. यंदाच्या हंगामातील हे निचांकी तापमान असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. पुण्यात बुधवारी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर गुरुवारी तर एनडीए, हवेलीमध्ये ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे पहायला मिळत आहे. हे या हंगामातील निचांकी तापमान नोंदले गेले आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा,विदर्भात गारठा कायम
दिवसभरही थंडी कायम राहत असल्याने पुणेकर स्वेटर घालून घराबाहेर पडत आहेत. उत्तरेकडील थंड वा-यांमुळे महाराष्ट्र गारठून गेला आहे. परिणामी राज्याच्या किमान तापमानात मोठी घट झालेली आहे. किमान तापमानाचा पारा १० अंशांखाली घसरला असून पुण्यासह मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. तसेच विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वा-यांची स्थिती कायम आहे. दक्षिण गुरूवारी महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत किमान तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR