28 C
Latur
Saturday, March 1, 2025
Homeमहाराष्ट्रमराठवाड्यात पाच दिवसांआड पाणीपुरवठा

मराठवाड्यात पाच दिवसांआड पाणीपुरवठा

६८ नगरपालिकांतील चित्र, काही शहरे टँकरग्रस्त

छत्रपती संभाजीनगर : ऐन हिवाळ्यात मराठवाड्यातील अनेक शहरांना पाणीटंचाईचे चटके बसत असून ७३ पैकी ६८ नगरपालिका आणि नगर पंचायतींमध्ये सरासरी पाच दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही शहरे तर आतापासूनच टँकरग्रस्त झाली आहेत. मराठवाड्यातील धरणांमध्ये आता केवळ ४०.८० टक्के पाणीसाठा आहे.

धरणातील पाणीसाठा कमी होण्याबरोबरच पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी ढिसाळपणे केल्यामुळे तालुकास्तरावरील निमशहरी भागांत पाण्याची मोठी टंचाई आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात टंचाईचे स्रोत तपासले जात आहेत. पाणी योजना रखडल्याने दुष्काळाच्या झळा पुन्हा बसू लागल्या आहेत. मात्र, पैठण, कुंडलवाडी, किनवट, अर्धापूर, हिमायतनगर आणि नायगाव या सहा नगरपालिकांमध्ये दररोज पाणीपुरवठा होत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ नगरपालिकांपैकी केवळ पैठण येथे दररोज पाणीपुरवठा होत असून कन्नड शहरात सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. पाणीसाठा जानेवारीअखेरपर्यंत कसाबसा पुरेल. खुलताबाद, फुलंब्रीमध्ये अनुक्रमे तीन दिवसाला पाणीपुरवठा होत आहे.

जालना जिल्ह्यातील अंबडला पाणीपुरवठा दहा दिवसांतून एकदा होतो. वितरण व्यवस्था आणि पाणी साठवण क्षमता कमी असल्यामुळे असे घडते, असे सांगण्यात येते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या गावी भोकरदनमध्ये १५ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. सद्य:स्थितीत जुई मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा पूर्णत: संपला असल्याने शेलूद येथील धरणातून २५ टँकरने प्रतिदिन दोन फे-या पूर्ण केल्या जात आहेत.

परभणी जिल्ह्यात यावर्षी सर्वांत कमी पाऊस नोंदला गेला. परिणामी विंधन विहिरीतून टँकरने पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय असणार नाही, असे कळवण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यात सरासरी तीन दिवसांआड एकदा पाणी येते.

हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला असला तरी नळ योजनांची दुरुस्ती न केल्यामुळे पाणीपुरवठ्याची ओरड आहे. बीड शहराची स्थितीही वाईट असून नऊ दिवसांआड एकदा पाणीपुरवठा होतो. माजलगाव धरणातून होणारा पाणीपुरवठा कसाबसा पुरेल, पण अंबाजोगाई येथे सहा दिवसांआड, परळी येथे चार दिवसांआड, माजलगाव येथे चार दिवसांआड पाणीपुरवठा होतो.

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा व लोहारा तालुक्यात आठ दिवसांआड एकदा पाणी मिळते. रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागलेल्या लातूर जिल्ह्यातही सरासरी पाच दिवसांआड पाणीपुरवठा होतो. औसा, देवणी, रेणापूर या पालिका क्षेत्रातही सात दिवसांआड पाणीपुरवठा होतो.

छत्रपती संभाजीनगरसारख्या महापालिकेतही कुठे पाच दिवस तर कुठे चार दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. शहरातील काही भागांत मध्यरात्री ३ च्या सुमारास पाणी येते. त्यामुळे एका बाजूला थंडी आणि एका बाजूला पाणीटंचाई, अशा स्थितीत मराठवाड्यातील शहरी व निमशहरी भागात राहणा-या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

जलसाठा ४०.८० टक्क्यांवर
मराठवाड्यातील मोठ्या धरणांमध्ये ४७.८९ टक्के पाणीसाठा असून मध्यम चार प्रकल्पांत २४.५२ तर लघु प्रकल्पांत २५.६३ टक्के पाणीसाठा आहे. धरणांतील एकूण पाणीसाठा ४०.८० टक्के आहे. जायकवाडी धरणात समन्यायी पाणीवाटप झाल्याने टंचाई दूर होईल असे सांगितले जात असले तरी जीर्ण जलवाहिन्यांमुळे दुष्काळाची तीव्रता वाढते आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR