निलंगा : प्रतिनिधी
लातूर-जहिराबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन दोन वर्षाचा कालावधी झाला नसतानाही महामार्गावर भेगा पडून व रस्ता खचून झालेल्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले. त्याची दखल घेऊन खा.डॉ शिवाजीराव काळगे यांनी महामार्गाची पाहणी करून मोठ्या प्रमाणात रस्ता खराब झाला असताना प्रशासन मात्र मुग गिळून गप्प का? होते. ही फार मोठी शोकांतिका आहे म्हणत अभियंत्याची व गुत्तेदाराची खरडपट्टी काढत १५० जणांचे बळी गेले त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला.
दोन वर्षापूर्वी रहदारीसाठी खुला झालेला लातूर-जहीराबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्ता सहा महिन्यातच खचून जाऊन अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. बाभळगाव ते औराद शहाजानी दरम्यान प्रत्येक एक किमी अंतरावर रस्ता आडवा उभा खचला आहे. अनेक ठिकाणी रस्ता जम्पिीग होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होऊन १५० पेक्षा अधिक नागरिकांचा जीव गेला तर अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले. रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी वारंवार नागरीकांतून झाली तरीही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने मागच्या दहा दिवसांपासून काँग्रेचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीने पानंिचंचोली ते औराद शहाजानी दरम्यान रस्त्यावरून परीक्रमा आंदोलन सुरू करण्यात आले.
आंदोलनाच्या दरम्यान हायवे लगतच्या गावातील नागरिकांशी व अपघातात मृत्यू पावलेले व जखमी झालेल्या कुटुंबाला भेटी दिल्या. गावातील नागरिकांच्या सह्याची मोहीम हाती घेण्यात आली. कॉग्रेसच्या आंदोलनाची दखल घेऊन खा.डॉ शिवाजीराव काळगे यांनी दि ५ जुलै शुक्रवारी रोजी बाभळगाव ते निटूर दरम्यान खराब झालेल्या रस्त्याची पाहणी खराब रस्त्याबद्दल खंत व्यक्त करीत एमएमआरडीए चे अभियंता इंगळे व गुत्तेदार घोरपडे यांना फोनवर संपर्क करुन रस्ता दुरुस्तीची जबाबदारी असताना तुम्ही एवढे बेजबाबदार कसे वागू शकता.
तुम्हाला अपघातात मृत्यू पावलेल्या जीवांचे कांही देणेघेणे आहे का नाही असा प्रश्न उपस्थित करीत दररोज अपघात होऊन एखाद्याच्या घराला कुलूप लागणे ही दु:खद घटना आहे. तात्काळ रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करावे अन्यथा लोकसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले असून पंधरा दिवसात रस्ता दुरुस्ती पुर्ण करु असा शब्द अभियंता इंगळे यांनी खासदारांना दिला.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, माजी प.स सभापती अजित माने, दिनकर निटूरे, बालाजी भूरे, रमेश मोगरगे, बाबुराव शिंदे, गंगाधर चव्हाण अदी उपस्थित होते.