अहमदपूर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी कायम अर्थ पुरवठा करत असलेली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या कार्यातून देशात लौकिक प्राप्त केला, असे गौरवोद्गार केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी काढले. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अहमदपूर तालुक्यातील चिखली येथील नुतन विस्तारित कक्षाच्या उद्घाटन सोहळया प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी बँकेचे मार्गदर्शक सहकार माजी मंत्री महर्षी दिलीपराव देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाबासाहेब पाटील, बँकेचे चेमरमन आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्यासह माजी आमदार बब्रूवान खंदाडे, बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, रेणा कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, संत शिरोमणीचे चेअरमन शाम भोसले, डॉ. दीपाताई गिते व सर्व संचालक मंडळ आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले की, लातूर जिल्हा बँकेने शेतकरी हिताच्या अनेक योजना आखून त्यांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे केली म्हणूनच मोठ्या प्रमाणात जनतेचा विश्वास लातूर जिल्हा बँकेने कमावला आहे. शून्य टक्के एनपीए असणारी लातूर जिल्हा बँक निश्चितच कौतुकास पात्र असून भविष्यात देखील अशाच पद्धतीने चांगले कार्य बँकेच्या संचालक मंडळाकडून होत राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपल्या प्रास्ताविकात बँकेचे चेअरमन लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले की, सहकाराच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक पुरवठा करुन विकास पोहोचण्याचे काम लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे.
चिखली येथील बँक शाखा उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ५० लाख रुपयेच्या ठेवी येथील ग्रामस्थांनी जिल्हा बँकेकडे ठेवल्या असून हे विश्वासाचे एक प्रतीक आहे. ग्रामीण भागातील नागरीकांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आवश्यक असणारी रक्कम बँकेच्या शाखेत जावून काढणे अडचणीचे होत असल्याने गावातच एटीएम व्हॅनद्वारे फिरती शाखा सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात याचा लाभ नागरीकांना होत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या जन्मभूमी असलेल्या चिखली गावात जिल्हा बँकेची शाखा सुरु करण्यात आली याचा आनंद असून या शाखेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरीकांना उत्तम सेवा पुरवली जाईल असे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले.
यावेळी अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी जिल्हा बँकेच्या गौरवशाली वाटचालीची माहिती देवून जिल्हा बँकेचे विकासाच्या बाबतीत असलेले योगदान अधोरेखित केले. कार्यक्रमास तुकाराम पाटील, कार्यकारी संचालक एच. जे. जाधव, विविध संस्थाचे पदाधिकारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सचिन सुर्यवंशी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव यांनी मानले.