पुणे : प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविकांत तुपकर यांच्यावर कारवाई करत आता पक्षाशी त्यांचा संबंध राहिला नसल्याचं स्पष्ट केलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.
तुपकर यांना अनेकदा संधी दिल्यानंतरही शिस्तपालन समितीसमोर ते हजर राहिले नाहीत. त्यांनी शेतकरी संघटनेत खूप काम केले असल्याने आम्ही त्यांच्याबाबत हकालपट्टी हा शब्द वापरणार नसल्याचंही जालिंदर पाटील म्हणाले.
रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांनी राजू शेट्टींविरोधात भूमिका घेत शब्द देऊनही बुलडाण्याची जागा मला मिळू शकली नाही असा आरोप त्यांनी केला होता.
रविकांत तुपकर यांनी बोलावलेल्या बैठकीशी संघटनेचा कोणताही संबंध नाही असंही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलंय. जालिंदर पाटील म्हमाले की, तुपकर यांना अनेकदा संधी देऊनही ते आमच्या शिस्तपालन समितीसमोर हजर झालेले नाही. उलट ते शेट्टी यांच्यावर सातत्याने टीका करताना दिसतात. गेल्या तीन ऊस परिषदेलाही ते गैरहजर राहिले आहेत.
बुलडाणा लोकसभासुद्धा तुपकर यांनी संघटनेच्या एबी फॉर्म वर लढण्याऐवजी अपक्ष लढवली. याचा अर्थ त्यांना स्वाभिमानी संघटनेत कोणताही रस दिसत नाही. अलिकडे तर तुपकर हे स्वाभिमानी ही संघटना माझ्याच नावावर असल्याचा ते दावा करू लागलेत. या संभ्रमावर आम्हाला उत्तर हवंय कारण तुम्ही दिलेल्या राजिनाम्याचे पत्र आमच्याकडे आहे मग तरीही संघटनेवर तुम्ही दावा कसा काय करता? असा प्रश्न जालिंदर पाटील यांनी विचारला.
रविकांत तुपकर आणि राजू शेट्टीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आजपासून कोणताही संबंध राहिलेला नाही. असे आम्ही शिस्त पालन समितीच्यावतीने जाहिर करतो असे पत्रकार परिषदेत जालिंदर पाटील यांनी सांगितले.