अकोला : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मधमाशांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना नुकतीच अकोल्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथे घडली आहे. रोडगे जेवणाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच, या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, शेतीतील काम करणा-या महिलांनी शेतामध्येच रोडगे बनविण्याचा बेत ठरवला होता. रोडगे बनविण्यासाठी महिलांनी गौ-या पेटविल्या. त्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. यामुळेच झाडावरील मधमाशांचे पोळे उठले आणि संपूर्ण परिसरात मधमाशा पसरल्या.
या मशमाशांनी रोडगे बनविण्यासाठी जमलेल्या महिलांवर हल्ला केला. यामध्ये काही महिलांनी ताडपत्रीने स्वत:चा बचाव केला. तर हल्ल्यामध्ये रेश्मा अतिश पवार या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण यावेळी उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.