छत्रपती संभाजीनगर : मराठ्यांच्या लोकांनी मराठ्यांवर आरोप करणे बंद करा. तुमच्यामुळे एक दिवशी जात मरेल.. लवकर शहाणे व्हा.. असा सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना दिला आहे. जातीवाद भुजबळ करत आहे. राज्यात जे काही होतोय ते भुजबळ घडून आणत आहे, अशी टीका देखील मनोज जरांगेंनी यावेळी केली. ते माध्यामांशी बोलत होते.
मराठा समाजाचे आंदोलन भरकटत चालले आहे. मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नव्हे, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगेंवर केली.त्यावर आज मनोज जरांगेंनी आज प्रत्युत्तर दिले आहे. मनोज जरांगे म्हणाले, आंदोलन भरकटले नाही. मराठा समाज हा १९८४ पासून कुणबीत आहे.
महाराष्ट्रातला सर्व मराठा हा कुणबी आहे हेच गेल्या १० वर्षापासून मी सांगत आहे. कधीतरी जातीकडून बोलायला शिका… तुमच्या वडिलांचे मोठे योगदान आहे. कधीतरी मराठ्यांच्या लेकरांसाठी बोलायला शिका.. खरे बोलायला शिका…मराठ्यांवर काय वेळ आली आहे. तुमच्या आसपासचे ओबीसींचे नेते मराठ्यांच्या विरोधात यायला लागले. तुमच्या नगर जिह्यातले ओबीसीचे आमदार इकडे येऊन ओरडत आहे ते नाही भरकटलेले दिसत नाहीय मी कायद्याला धरून बोलतो मात्र हे आंदोलन भरकटले म्हणतात. मराठ्यांच्या लोकांनी मराठ्यांवर आरोप करणे बंद करा.. तुमच्यामुळे एक दिवशी जात मरेल.. लवकर शहाणे व्हा.. .
भुजबळांकडून जातीवाद
राज्यात जातीवाद भुजबळ करत आहे. राज्यात जे काही होत आहे ते भुजबळ घडून आणत आहे. दुसरे कोणी नाही.. आम्ही कोणाला दोष देत नाही आणि बोलणार पण नाही. १३ तारखेपर्यंत शांत राहण्याचे शंभुराज देसाईंचे म्हणणे आहे. आम्ही शांत राहू १४ पासून बघून घेऊ काय करायचे. भुजबळ साहेब मी काय आहे हे तुम्हाला कळणार नाही. या वयात हाताने एवढ्या मोठ्या समाजाची नाराजी व्यक्त करून घेऊ नका.