पहाटेपासूनच दमदार, नदी, नाले तुडुंब, रस्त्यांनाही तलावाचे स्वरूप
मुंबई : प्रतिनिधी
राजधानी मुंबईसह उपनगरात आणि परिसरातील जिल्ह्यांत शनिवारी पहाटेपासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई जिल्ह्यातही पावसामुळे नदी, नाले, बंधारे भरून वाहत आहेत. कोकणात जोरदार पाऊस कोसळत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तसेच घरांमध्येही पाणी शिरले आहे.
मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाले असून पाण्यातून मार्ग काढत वाहने व नागरिक प्रवास करतानाचे चित्र दिसत आहे. मुंबईसह उपनगर आणि कोकणतही मुसळधार पाऊस सुरू आहे. रायगड जिल्ह्याातील अलिबागमध्ये रुग्णालयात पाणीच पाणी झाले आहे. पावसाचा जोर वाढल्याने अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या दुस-या मजल्यावरील सर्जिकल वार्डमध्ये पाणीच पाणी झाले होते. तसेच अनेक रस्ते पाण्यात बुडाल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली.
ठाणे जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. येथील ठिकठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. रस्त्यावरुन वाहन चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. सतत कोसळणा-या पावसामुळे नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात संततधार सुरू आहे. पालघर जिल्ह्यात पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली असून आज दिवसभर वर्षाव सुरू आहे. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहात आहेत.
गुहागरमध्ये तासाभरात कहर
मुसळधार पावसाचा गुवगर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेला तडाखा बसला. येथील बाजारपेठेत सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने व्यापा-यांची तारांबळ उडाली. तसेच गुहागर-चिपळूण महामार्गाला नदीचे स्वरूप आले.