कळंब : सतीश टोणगे
गरीब, सर्वसामान्यांची सेवा करत करत शेकडो जण अतिश्रीमंतांच्या यादीत जाऊन बसले आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत समाजसेवेच्या नावाखाली अनेकजण व्यवसाय करू लागले आहेत. राजकारण, समाजकारण या दोन्हीलाही सोन्याची झळाली मिळाली. बोटावर मोजण्याइतके जणच उपाशी पोटी समाजसेवेचे व्रत घेऊन समाजबदलासाठी काम करत आहेत. राजकारण हा व्यवसाय की समाजसेवा, यावर आता चर्चा होऊ लागली आहे. हा एक धंदा बनला आहे.
८० टक्के समाजकारण.. २० टक्के राजकारण हे ब्रीदवाक्य घेऊन अनेक जण राजकारणात स्थिरावले आहेत. समाजकारणाच्या नावाखाली राजकारण करत असल्याची चर्चा ग्रामीण भागात होत आहे. राज्यात राजकारणाने तर कळसच गाठला आहे. नीतिमत्ता, आदर्श, निष्ठा याचा काही संबंध राहिलेला नाही. मतदारांनी विकासासाठी निवडून द्यायचे व त्यानंतर, ‘पन्नास खोके एकदम ओके’ म्हणत स्वार्थ साधण्यासाठी उड्या मारायच्या…. सध्या लोकसभेच्या निवडणुकीत, तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्ही पन्नास खोके घेऊन विकले जाऊ.. अशा पोस्ट टाकून ट्रोल केले जात आहे.राजकारण हा ‘धंदा’ तेजीत चालला असल्याची कुजबूज होऊ लागली आहे. बिचारा मतदार मात्र मोफत मताचे दान देत असतो.
राजकारण करणा-या मंडळींनी सामाजिक कामाचे सुद्धा वाटोळे करून टाकले आहे. या निवडणुकीत पन्नास खोक्यांवरच चर्चा रंगली. निवडून आल्यानंतर तरी खोके घेऊन दुस-या पक्षात जाणार नाहीत, याची खात्री कोण देणार आहे… कोंबडी आधी का अंडे आधी …हा प्रश्न जसा बुचकळ्यात टाकणारा आहे, तसाच राजकारण हा धंदा की समाजसेवा, याचे उत्तरही देता येणार नाही.