मुंबई : पंतप्रधान मोदीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टिंगल, टवाळी करत त्यांना शहजादे म्हणतात. मात्र, देशातील लोक राहुल गांधींकडे गांभीर्याने पाहतात, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. भाजप नेते अनेक वेळा राहुल गांधी यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांच्यावर टीका करत असतात. या टीकेला प्रत्युत्तर देत पवार यांनी राहुल यांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप गंभीर आहे, असेही म्हटले.
एका मुलाखतीदरम्यान बोलताना शरद पवार यांनी राजकारणातील अनेक पैलूंवर भाष्य केले. यावेळी त्यांनी सांगितले की, राहुल गांधींनी ‘भारत जोडो’ यात्रा काढली त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. या यात्रेत त्यांनी प्रत्येक स्थरातील लोकांच्या भेटी घेतल्या, महिला, तरुण, बेरोजगार, दलित, शेतकरी या सगळ्यांना ते भेटले, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावरून स्पष्ट होते की, ते राजकारणाबाबत गंभीर आहेत. यामुळे त्यांच्यासोबत काम करता येऊ शकते, असेही पवार म्हणाले. यासोबतच भाजपाला यावेळी २०१४ आणि २०१९ पेक्षा कमी जागा मिळतील. यावेळी देशातील समविचारी पक्षांना एकत्र आणून आम्ही देशाला एक स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करू, राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळणार असा दावाही त्यांनी केला.