मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘वर्षा’ बंगल्यावर का राहायला जात नाहीत, त्याठिकाणी लॉनमध्ये काहीतरी खोदकाम केले होते, तिथे कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंगे पुरलीत असे तिथला स्टाफ आणि भाजपातील आतील गोटातून चर्चा आहे असा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे आहोत परंतु काही चर्चा सुरू आहेत. कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंगे काही लोकांनी आणलीत. ती शिंगे ‘वर्षा’ बंगल्याच्या लॉनमध्ये पुरलीत. मुख्यमंत्रिपद दुस-या कुणाकडे टिकू नये असे काही आहे. तिथला कर्मचारी वर्ग तसे सांगतो. आम्ही मुद्दा लावून धरत नाही.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे. हा प्रतिष्ठेचा विषय आहे. तिथे काय झालेय, काय घडलेय, मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकी भीती कशाची आहे. ते अस्थिर आणि अस्वस्थ का आहेत हे महाराष्ट्राला समजायला पाहिजे असे ते म्हणाले.
तसेच मारुती कांबळेचे काय झाले, देवेंद्र फडणवीस ‘वर्षा’ बंगल्यावर का राहायला जात नाहीत हा आमचा प्रश्न आहे.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन इतके महिने झाले तरी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे तिथे आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का जात नाहीत, राहायला गेलो तरी मी झोपायला जाणार नाही असे फडणवीस म्हणतायेत असे ऐकण्यात आले. हा काय प्रकार आहे. अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे शिंदे गटात जे लिंबूसम्राट आहेत त्यांनी उत्तर द्यावे, असा टोला संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंसह नेत्यांना लगावला आहे.