शिरुर अनंतपाळ : प्रतिनिधी
मान्सूनपुर्व पावसानंतर मृग नक्षत्रामध्ये पडलेल्या समाधानकारक पावसामुळे शेतक-याांंनी उत्साहात चाढ्यावर मुठ धरून काळ्या आईची ओटी भरण्यास सुरुवात केली आहे. या खरीप हंगामात २६ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार असून यात सर्वाधिक २३ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होणार आहे. मृग बरसल्याने शेतकरी चांगलाच सुखावला असून यंदा मृगात पेरणी होत असल्याने उत्पादनात मोठी वाढ होईल असे शेतक-यातून बोलले जात आहे.
गेल्या आठवड्यपासून पाऊस पडत आहे. यंदा मृगाच्या पावसाने तालुक्यातील शेतक-यामध्ये आनंदी वातावरण पसरला असून शेत जमिनीत पेरणी योग्य ओल झाली आहे. दरम्यान शिरूर अनंतपाळ तालुका हा प्रकल्पाचा तालुका म्हणून ओळखला जातो.३१ हजार ७०० हेक्टर एवढे क्षेत्र असलेल्या या तालुक्यात २८ हजार ३०० हेक्टर एवढे क्षेत्र पेरणी योग्य आहे. यात यावर्षी २६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होणार असून यात सर्वाधिक २३ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होणार आहे. सोयाबीन खालोखाल तुर,मुग, उडीद, ज्वारीचा तर शिल्लक क्षेत्रावर इतर पिकांचा पेरा होणार आहे.