मुंबई : प्रतिनिधी
देशात कांद्याच्या दरात मोठी वाढ होत असताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतक-यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कांद्याची नासाडी रोखण्यासाठी आणि साठवणुकीसाठी राज्यात अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा बँक तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेऊन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कांदा हे नाशवंत पीक असल्याने अणुऊर्जेच्या माध्यमातून त्यावर विकिरण प्रक्रिया करून कांद्याची साठवणूक करता येणार आहे. या कांदा बँकेच्या माध्यमातून शेतक-यांना मोठा फायदा होणार आहे.
कांद्याची महाबँक ही संकल्पना प्रत्यक्षात आली असून त्याची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून होत आहे. येथे हिंदुस्थान अॅग्रो इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कांद्याची बँक सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत सांगितले. कांदा महाबँक या कांद्याचे उत्पादन ज्या भागात जास्त प्रमाणात होते, अशा ठिकाणी उभारल्या जाणार आहेत.