जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील आतनूर या गावाला जोडणारा तिरु नदीवरील पर्यायी पूल शनिवारी रात्री वाहून गेला होता . यानंतर बुधवारपर्यंत पर्यायी पुलाची उभारणी केलेली नव्हती यामुळे नागरिकांना नदीमधून वाहत्या पाण्यामधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे तरचिंंचोली, मेवापूर तसेच इतर गावातील विद्यार्थी रस्ता नसल्यामुळे घरीच आहेत. त्यांच्याही शिक्षणाचे मोठे नुकसान होत आहे
तिरू नदीवरील अतनूर गावाला जोडणारा नविन पूल मंजूर झाला होता. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी घाईघाईने पावसाळ्याचा विचार न करता नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी जुना असलेला पूल पाडून टाकला. यानंतर नागरिकांना ये-जा करण्यासाठी तसेच वाहनांसाठी पुलाच्या बाजूलाच पाईप टाकून कच्चा पर्यायी पूल करण्यात आला परंतु पर्यायी पूल करताना या ठिकाणी एवढे मोठे पात्र असताना या ठिकाणी पर्यायी पूल टिकेल का नाही याचा अभ्यास करण्यात आलेला नाही .
शनिवारी रात्री तिरू नदीच्या क्षेत्रामध्ये पाऊस पडला यानंतर नदीला थोडे पाणी आले आणि या पाण्यामध्ये जो पर्यायी पूल उभारण्यात आला होता तो वाहून गेला . रविवार पासून घोणसी ते आतनूर व पुढे बाराळी गव्हाण हातराळ या गावाचा रस्ता बंद झाला. पूर्णपणे वाहतूक ठप्प आहे चार दिवस झाले मेवापूर तसेचचिंंचोली या परिसरातील विद्यार्थी अतनूर येथे विकास विद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतात परंतु नदीचा पूल वाहून गेल्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेत जाणे कठीण झाले आहे.
अतनूर येथील आठवडी बाजारातही नागरिकांना खरेदीसाठी जाता येत नाही अशी परिस्थिती झाली आहे. ज्या नागरिकांना अत्यावश्यक कामे आहेत असे नागरिक आपला जीव धोक्यात टाकून वाहत्या पाण्यामधून नदी ओलांडून दुस-या बाजूला जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे एवढी मोठी यंत्रणा असतानाही पर्यायी पूल उभा करण्यासाठी चार दिवस लागत असतील तर या निष्क्रीयतेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पावसाळ्यामध्ये पुलाचे बांधकाम पूर्ण होणार नाही याची माहिती असतानाही जुना पूल कशासाठी पाडला असा सवाल अतनूर येथील नागरिक विचारत आहेत.