नागपूर : सलीम कुत्ता प्रकरणावरुन विधान भवनात सत्ताधारी-विरोधकांमध्ये गदारोळ पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांनी सभागृहाबाहेर बोलताना सरकारवर घणाघात केला. तसेच त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. कोणाच्याही मनात आलं म्हणून कारवाई केली जात आहे. आमच्याकडे पुरावे असून देखील एसआयटी स्थापन का केली जात नाही? भाजपचा निर्लज्ज कारभार सुरुयं, अशी टीका ठाकरेंनी केली.
नागपूरच्या स्फोटाची चौकशी झाली पाहिजे. अधिवेशनाची सुरुवात नबाव मलिक यांच्या मुद्द्याने झाली. आम्हाला उपमुख्यमंत्र्याबाबत अभिमान वाटू लागला होता. आम्ही पत्र लिहिले इक्बाल मिर्ची, प्रफुल्ल पटेल यांचे काय म्हणून विचारणा केली. पण, आम्हाला अद्याप उत्तर मिळाले नाही, असे ठाकरे म्हणाले.
राज्य कोण चालवतंय हे कळत नाही. आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा आमच्यावर आरोप करण्यात आले. आज तेच तुमच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे आम्ही शेण खाल्ले असेल तर तुम्ही देखील तेच खात आहात. खरे कोण खोटे कोण होऊन जाऊद्या. कर नाही तर डर कशाला. एसआयटी लावा. आमचे मंत्री ज्याच्या लग्नाला गेले होते तो देशद्रोही नाही हे जाहीर करुन टाका, असा निशाणा ठाकरे यांनी साधला.
लग्नाला पोलीस अधिकारी देखील होते. त्यांच्यावर कारवाई झाली. मग कोणी मंत्री होते का याची चौकशी तरी करा, आधीच काय जाहीर करताय, असा सवाल ठाकरेंनी केला.