लातूर : प्रतिनिधी
गेल्या पाच-सात दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व वादळी वा-यात महावितरणला युध्दसदृष्य परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. अखंडीत वीजसेवेसाठी शहरी भागासह ग्रामीण भागातील अधिकारी, कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. अवकाळी पाऊस सुरू झाला की, सोबतच वादळी वारा व कडाडणा-या जीवघेण्या विजांचा सामना सामना करत महवितरण तत्परतेने कार्यरत राहत आहे. प्रसंगी प्राणांकीत अपघात होवू नये म्हणून सावधगिरी,
काळजी म्हणून वीजपुरवठा प्रसंगी बंद करावा लागत आहे. कालच्या पावसात अनेक भागातील घरांमध्ये पाणी साचल्याने वीजप्रवाह पाण्यात उतरूनये म्हणून सावधगिरी म्हणून वीजपुरवठा काही वेळासाठी बंद करण्यात आला होता. तर काही ठिकाणी वीजतारांवरती झाडांच्या फांद्या पडल्यानेही वीजपुरवठा बंद करणे भाग होते. पाण्याचा जोर कमी होताच महावितरणचे कर्मचारी कामाला लागले व अवघ्या एक दोन तासांच्या आत शहरी भागातील वीजपुरवठा पुर्ववत करण्यात आला. ग्रामीण भागातील विजेचे पोल जास्तप्रमाणात कोसळल्याने पर्यायी व्यवस्था उभा करून जवळपास नव्वद टक्के भागातील वीजपुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे.
एकूणच अवकाळी पावसाने झालेली पडझड व महावितरणने कर्मचा-यांना दिलेला अलर्ट यामुळे प्रसंगावधान दाखवत पडत्या पावसातही वीजकर्मचारी कार्यरत राहत आहेत. अशा प्रसंगी वीजग्राहकांनी वस्तूस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत वीजपुरवठा खंडीत झाल्याच्या काळात महावितरणला सहकार्य करावे व वीजयंत्रणे पासून सावध रहावे, असे अवाहन महावितरणने केले आहे.