नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीत प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. जुन्या प्रचाराप्रमाणे आता कंदील प्रचार सुरु होणार आहे. दिल्ली निवडणुकीत लोकांचा कल कोणाकडे आहे, याबाबतचा सीव्होटरचा अंदाज समोर आला आहे. यात फारसा फरक दिसत नाही, असे असताना भाजपा दिल्लीतील सत्ता काबीज करण्यासाठी उत्सुक आहे, तर ‘आप’ला किल्ला टिकवायचा आहे.
यावेळी माझ्या अंदाजानुसार दिल्लीत ५५ जागा मिळत असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. परंतू जर माता-भगिनींनी जोराचा धक्का दिला तर त्या ६० वरही जाऊ शकतात, असे केजरीवाल म्हणाले. सायंकाळी पाच वाजता प्रचार संपल्यानंतर केजरीवाल यांनी हा दावा केला आहे.
निवडणुकीतील गैरप्रकार रेकॉर्ड करण्यासाठी झोपडपट्टी भागात स्पाय कॅमेरे आणि बॉडी कॅमेरे वाटले आहेत. भाजपाचे लोक आणि गुंडांची दुष्कृत्ये रोखण्यासाठी हे केले आहे. मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी हे लोक ३-४ हजार रुपये देऊन त्यांच्या बोटांवर शाई लावणार आहेत. मतदारांनी ही शाई लावून घेऊ नये असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.
आपली, सरकार बदलण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न सी व्होटरने दिल्लीतील मतदारांना विचारला असता १ फेब्रुवारीपर्यंतच्या ट्रॅकरनुसार, या प्रश्नावर उत्तर देताना, विद्यमान सरकारच्या कामावर आपण नाराज आहोत आणि यावेळी बदलाची इच्छा असल्याचे ४३.९ टक्के लोकांनी म्हटले आहे. तसेच, १०.९ टक्के लोकांचे म्हणणे आहे की, ते नाराज आहेत, पण सरकार बदलण्याची इच्छा नाही. तसेच, ३८.३ टक्के लोकांचे म्हणणे आहे की, आपण सरकारच्या कामकाजावर नाराज नाही यामुळे बदलही करू इच्छित नाही.