33 C
Latur
Monday, June 2, 2025
Homeमहाराष्ट्रआभाळ फाटले

आभाळ फाटले

राज्यात तुफान पाऊस; १०७ वर्षांचा विक्रम मोडला मुंबईची दैना, भुयारी मेट्रो स्थानकात घुसले पाणी मंत्रालयासह मुंबईतील अनेक भागांना पाण्याचा वेढा

मुंबई : प्रतिनिधी
अपेक्षेपेक्षा दोन आठवडे आधीच महाराष्ट्रात पोचलेल्या मान्सूनने मुंबईसह अनेक जिल्ह्यांत अक्षरश: दाणादाण उडवून दिली. सर्वत्र आभाळ फाटल्याचे चित्र आहे. मुंबई, ठाणे, रायगडसह संपूर्ण कोकणात, तसेच पुणे, सोलापूर, साता-यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. मुंबईत तर तब्बल १०७ वर्षांनंतर मे महिन्यात एवढा विक्रमी पाऊस झाला. मुंबईत २९४ मिमी पाऊस कोसळल्याने कुलाब्यापासून संपूर्ण मुंबई जलमय झाली. नव्याने सुरू झालेल्या मेट्रो स्थानकांतही पाणी घुसले. तसेच ट्रॅकवर पाणी साठल्याने रेल्वेसेवाही ठप्प झाली. रस्ते वाहतूकही खोळंबली. त्यामुळे मुंबईची अक्षरश: दैना झाली.

मान्सूनचे केरळात १ जूनला तर मुंबईत १० जूनपर्यंत आगमन होईल अशी अपेक्षा होती. परंतु अनुकूल वातावरणीय परिस्थितीमुळे आठ दिवस आधीच मान्सूनचे शनिवारी केरळात आगमन झाले व अवघ्या २४ तासात शब्दश: वा-याच्या वेगाने मान्सून महाराष्ट्रात पोचला. दोन आठवडे आधीच मान्सून मुंबईत दाखल झाल्याने मुंबईची अक्षरश: दाणादाण उडाली. भायखळा, वरळी, लालबाग, परळ, दादर, सायन, कुर्ला, चेंबूर, सांताक्रूझ भागात मोठ्या पाणी तुंबल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली, तर रेल्वे वाहतूक विस्कळित झाली होती. नव्याने सुरू झालेली भूमिगत मेट्रो सेवाही स्थानकात पाणी घुसल्याने बंद करावी लागली. पहिल्याच पावसाने मुंबईची दैना झाल्याने सरकारच्या दाव्यांची पोलखोल झाली असून, त्यांना आरोपांच्या अतिवृष्टीला समोरे जावे लागत आहे.

यापूर्वी १९१८ साली मुंबईत २७९ मिमी पावसाची नोंद झाली होती. तो विक्रम रात्रीपासून कोसळणा-या पावसाने मोडला. मुंबईत सोमवारी सकाळपर्यंत २९४ मिमी पावसाची नोंद झाली होती. नरिमन पॉइंट परिसरात गेल्या २४ तासांत तब्बल २५२ मिमी पावसाची नोंद झाली. हीच परिस्थिती मध्य मुंबई, मुंबई उपनगर व शेजारील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात होती. पुणे जिल्ह्यातील बारामती,दौंड परिसरातही प्रचंड पाऊस झाला. पावसाने थैमान घातल्याने अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती.
पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागात अतिवृष्टी झाली आहे. दौंडमध्ये ११७ मि.मी., बारामतीत १०४.७५ मि.मी., इंदापुरात ६३.२५ मि.मी. इतका पाऊस झाला. बारामतीत २५ घरांशी अंशत: पडझड झाली असून पुरात अडकलेल्या ७ जणांना वाचविण्यात आले. ७० ते ८० कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. फलटणमध्ये १६३.५ मि.मी. इतका पाऊस झाला. एनडीआरएफची एक चमू फलटणमध्ये आहे. ३० नागरिक दुधेबावी गावाशेजारी अडकले होते. त्यांना निवास आणि भोजनाची सुविधा पुरविण्यात आली. सोलापूरमध्ये ६७.७५ मि.मी. पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात ६ नागरिक पुरात अडकले होते, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात ३ जण अडकले, त्यांचे बचावकार्य सुरु असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई जलमय, रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प
रविवारी रात्रीपासून कोसळणा-या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचल्याने रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. तिन्ही मार्गावरील उपनगरीय रेल्वेसेवा विस्कळित झाली होती. दृश्यमानता कमी असल्याने विमानसेवेवरही परिणाम झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी मुंबई तुंबणार नाही, अशी ग्वाही दिली होती. पण पहिल्याच पावसाने नालेसफाईच्या कामाची पोलखोल केली.

मंत्रालय परिसराला पाण्याने वेढले
रविवारी रात्रीपासून कोसळणा-या पावसाचा फटका राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असणा-या मंत्रालयाला देखील बसला. आठवडयाच्या पहिल्याच दिवशी कामावर येणा-या शासकीय कर्मचा-यांना सकाळी गुडघाभर पाण्यातून मंत्रालय प्रवेशासाठी वाट काढावी लागली. मंत्रालयाच्या गार्डन गेट, आरसा गेट येथे चांगलेच पाणी साचले होते. पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंत्रालय तसेच इतर शासकीय कार्यालयातील कर्मचा-यांना सोमवारी संध्याकाळी चार वाजताच लवकर घरी जाण्याची मुभा देण्यात आली.

तात्काळ पंचनाम्याचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

मुंबईत एनडीआरएफ सज्ज
मुंबईत ५ ठिकाणी एनडीआरएफ टीम कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी सज्ज आहेत. मुंबईत पुढील २४ तास विजांचा गडगडाट आणि वादळी वा-­यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, रायगडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला.

आपत्ती व्यवस्थापन केंद्र २४ तास सुरू ठेवा : शिंदे
राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून विशेषत: मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, नाशिक जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे ठाणे, मुंबई महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा करून मदत कार्याबाबत विविध सूचना दिल्या.या सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन केंद्रे २४ तास सुरू राहतील हे पहावे. तसेच अधिका-यांनी अतिशय काळजीपूर्वक आणि दक्ष राहून काम करावे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये आणि कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेवर आणि प्रभावी पावले उचलावी असे शिंदे यांनी सांगितले.

पवारांकडून पुणे जिल्ह्यातील गावांची पाहणी
राज्याच्या अनेक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पहाटेपासूनच बारामती, इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील गावांना भेट देऊन दिवसभर परिस्थितीची पाहणी केली. पवार यांनी पुणे ग्रामीण भागातील गावांचा दौरा करत असतानाच, मंत्रालयातील राज्यस्तरीय आपत्ती नियंत्रण आणि व्यवस्थापन केंद्राकडूनही अन्य जिल्ह्यातील पाऊस, धरणांची स्थिती, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला. मुसळधार पाऊस होत असलेल्या जिल्ह्यांच्या जिल्ह्याधिका-यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करुन परिस्थितीची, मदतकार्याची माहिती घेतली. शेतीचे, पिकांचे, पशुधनाचे, घरांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश त्यांनी दिले. राज्य आणि जिल्हास्तरीय अधिका-यांनी सतर्क रहावे, परस्परांच्या संपर्कात राहून समन्वयाने, सहकार्याने बचाव, मदतकार्य तात्काळ राबवावे, असे निर्देशही अजित पवार यांनी अधिका-यांना दिले.

आरोपांचा गडगडाट, विरोधकांची सरकारवर टीका
पहिल्याच पावसात मुंबईची दैना उडाल्याने, बहुचर्चित भुयारी मेट्रो पाण्यात गेल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,खा.वर्षा गायकवाड यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गेली तीन वर्ष मुंबई महापालिका त्यांच्या हातात आहे. या काळात केवळ भ्रष्टाचार झाल्यामुळे मुंबई बुडल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तर मुंबईत अनेक ठिकाणी प्रथमच पाणी साठले असून भ्रष्टाचाराच्या खड्डयांमध्ये ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. नालेसफाईची कामे नीट झालेली नाहीत.महापालिकेने मान्सूनपूर्व बैठका घेतलेल्या नाहीत. स्वत:ला विजनरी, इन्फ्रा मॅन बोलणारे कुठे गायब आहेत? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा हा माजी नगरसेवक आणि पदाधिका-यांना फोडण्यात जात आहे. मुंबईकरांचे आज जे हाल झाले, त्यातून काढलेला हा पैसा आहे. दोन आठवड्यांपूर्वी मेट्रो-३ च उद्घाटन झाले आहे. मात्र तिथे आज पाणी साचल्यावर आत जायला देत नाही.

भ्रष्टाचाराची गटारगंगा : हर्षवर्धन सपकाळ
मुंबईतील पहिल्याच मोठ्या पावसात रस्त्यावर राज्य सरकार आणि महानगरपालिकेतील प्रशासन राजच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहिल्याचे चित्र दिसले. रस्ते, रेल्वे ट्रॅक सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. चाकरमानी मुंबईकरांचे कामावर जाताना प्रचंड हाल झाले. मुंबई महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये मुंबईतील नालेसफाई व मान्सूनपूर्व कामावर खर्च करते पण दरवर्षी पहिले पाढे पंचावन्न असे चित्र दिसते. जनतेचा पैशावर कंत्राटदार व सत्ताधारी यांनी डल्ला मारून खिसे भरल्यानेच मुंबईकरांचे हे हाल होत आहेत, अशी जळजळीत टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. एका पावसाने भाजप शिंदेसेना आणि अजित पवारांच्या भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. यांचे कर्तृत्त्व इतके महान आहे की आगामी निवडणुकीत लोकांची मते मागायला यांना बोटीनेच घरोघरी जावे लागेल असा टोला त्यांनी लगावला. २०२४ मध्ये नालेसफाईसाठी २४९.२७ कोटी रुपये खर्च केले तर २०२५ मध्ये नालेसफाई आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी ३९५ कोटी रुपये खर्च केले, यासाठी ३१ कंत्राटदारांना काम दिले पण एवढा पैसा खर्च करुनही मुंबईतील नालेसफाई झाली नाही तर हातसफाई करून मुंबईच्या तिजोरीमधील मुंबईकरांच्या कराच्या पैशावर डल्ला मारला आहे असेही सपकाळ म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR