शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
सतत वाढणा-या डिझेलच्या दरांमुळे शेती मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून याचा थेट फटका शेतक-यांना बसत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नांगरणी, वखरणी, रोटाव्हेटर, पेरणी आदी कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर करत आहेत. मात्र डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टर मालकांनी मशागतीचे दर वाढवल्याने शेतक-यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
यंदा बियाणे, खते, कीटकनाशके यांचे दर आधीच वाढलेले असताना त्यात मशागतीचा खर्चही वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. अनेक लहान व अल्पभूधारक शेतक-यांना शेती करणे परवडेनासे झाले असून कर्ज काढून शेतीची तयारी करावी लागत आहे. पुर्वी प्रति एकर मशागतीसाठी लागणारा खर्च तुलनेने कमी होता. मात्र डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टर चालकांनी दरात वाढ केल्याने प्रति एकर खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी शेतक-यांच्या शेती बजेटवर अतिरिक्त भार पडत आहे. शेतकरी संघटनांनी केंद्र व राज्य शासनाने इंधनावरील कर कमी करून डिझेलचे दर नियंत्रणात आणावेत, तसेच कृषि क्षेत्रासाठी सवलतीच्या दरात इंधन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान शेतीसाठी आवश्यक सर्व घटकांच्या वाढत्या किमती आणि इंधन दरवाढ यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतक-यांसाठी मोठे आव्हान ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
















