23.8 C
Latur
Friday, May 30, 2025
Homeसंपादकीयकशी केलीस दैना...!

कशी केलीस दैना…!

नियोजित वेळेच्या आधी १६ दिवस महाराष्ट्रासह मुंबईत मान्सूनचा पहिला पाऊस धो…धो बरसल्याने मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली. मुंबईची तुंबई झाली. जिकडेतिकडे पाणीच पाणी झाल्याने नागरिकांची ‘आता जाऊ कुणीकडे’ अशी स्थिती झाली. मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला असला तरी उत्तर कोकणातील रायगड, मुंबई, ठाणे जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रात सोमवारी पूर्व मोसमी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांना पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे भीमा, नीरा, बाणगंगा या नद्यांना पूर आला. चंद्रभागेस पूर आल्याने पंढरपूरमध्ये दक्षतेचे आदेश देण्यात आले. सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातही पावसाने धुमाकूळ घातला. कोकणातील कुंडलिका, पाताळगंगा, सावित्री या नद्यांच्या पातळीत वाढ झाली. मुंबईत रविवारी रात्रीपासूनच सुरू झालेल्या पावसाने संततधार कायम ठेवत मुंबईची दाणादाण उडवली. पहिल्याच पावसात मुंबईची दैना झाली. रस्तेवाहतुकीचा बोजवारा उडाला, तर मध्य रेल्वेला जोरदार फटका बसला. हार्बर रेल्वेसेवा सीएसएमटी ते वडाळापर्यंत दुपारपर्यंत ठप्प होती. राज्यात पहिल्याच पावसाने दोन बळी घेतले. मुंबईत मे महिन्यात १०० वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. इतिहासात मंत्रालयात प्रथमच पाणीच पाणी झाले,

तर काही दिवसांपूर्वीच उद्घाटन करण्यात आलेल्या वरळीतील आचार्य अत्रे चौक हे भूमिगत मेट्रो स्थानक जलमय झाले. मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या भुयारी मेट्रोच्या कामाची पहिल्याच पावसाने पोलखोल केली. अ‍ॅक्वा मार्ग-३ला पावसाचा फटका बसला. आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकाच्या आत पावसाचे पाणी शिरले. भुयारी मेट्रो मार्गाच्या पाय-यांवरूनही पाणी वाहू लागल्याने हे मेट्रो स्थानक आहे की धबधबा असा प्रश्न निर्माण झाला. मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले, झाडे कोसळली. राज्याचा कारभार चालणा-या मंत्रालयात इतिहासात प्रथमच गुडघाभर पाणी तुंबल्याने एकच तारांबळ उडाली. मंत्रालयात पाणी शिरल्याने महायुतीच्या कारभारावर ताशेरे ओढले गेले. मुंबईत १८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. ३२ ठिकाणी झाडे कोसळली तर पाच ठिकाणी भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. मान्सूनचा तडाखा मुंबई, पुणे, सोलापूर, कर्नाटकातील कलबुर्गी, तेलंगणातील मेहबूबनगर आणि आंध्र प्रदेशातील कावलीपर्यंत बसला आहे. पुढील तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या ब-याच भागात तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बंगालचा उपसागर आणि ईशान्य भारतात आणखी वेगाने पुढे सरकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यपूर्णरीत्या आढावा घेत आहेत.

नागरिकांना मदत करण्यासाठी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मान्सूनचे केरळात १ जूनला तर मुंबईत १० जूनपर्यंत आगमन होईल अशी अपेक्षा होती. परंतु अनुकूल वातावरणीय परिस्थितीमुळे आठ दिवस आधीच केरळात मान्सूनचे आगमन झाले आणि अवघ्या २४ तासांत वा-याच्या वेगाने मान्सून महाराष्ट्रात पोहोचला. त्यामुळे मुंबईची अक्षरश: दाणादाण उडाली. मान्सूनचे आगमन जवळपास दहा ते बारा दिवस आधी झाल्याने मुंबई, कोकणसह महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली. ऐन मे महिन्यात पाऊस आल्याने पावसाळ्याच्या जून-जुलै महिन्यात पाऊस असेल की नाही अशी शंका आतापासूच व्यक्त केली जात आहे. हवामान खाते पाऊस येणार असे सांगते आणि नंतर पाऊस येत नाही असा आजवरचा अनुभव होता. परंतु यावेळी मान्सून लवकर दाखल झाला, मग तो आता लवकर जाणार का अशी शंका व्यक्त केली जात आहे. यावर हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, पाऊस म्हणजे नळ नाही… नळ चालू केला की पावसाला सुरुवात आणि बंद केला की पाऊस बंद… असे होत नाही. पावसासाठी समुद्रात निर्माण होणारी स्थिती आणि भौगोलिक स्थिती या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. वेळेआधी आलेला पाऊस आणि त्याच्या पीछेहाटीचा तसा कोणताही संबंध नाही. पावसाचा वेग विविध स्थितीवर अवलंबून असतो. पावसाचा आवेग ओसरला की, कदाचित एक-दोन दिवस तो पडणारही नाही.

पण पुन्हा पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली की पावसाचा जोर वाढेल. यंदा मोसमी वा-यांनी अत्यंत वेगाने केलेली वाटचाल दुर्मिळ असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. गत काही वर्षांत पाऊस येण्याचे निकष बदलले आहेत, पावसाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. पूर्वी उपग्रह नसताना अंदाज वर्तवण्याचे स्वरूप मर्यादित होते, आता उपग्रहामुळे अंदाज वर्तवण्याची क्षमता वाढली आहे. गत आठ वर्षे पाऊस सर्वसाधारण होता. त्यामुळे यंदा आलेला पाऊस लवकर वाटतो आहे. पाऊस लवकर आला म्हणजे फार काही वेगळे घडले असे नाही. यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत. केरळमध्ये मोसमी वारे दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात येण्यासाठी आठ-दहा दिवस लागतात हे आपण माणसांनी ठरवले आहे. मात्र, निसर्गाची अनेक रहस्ये अजून उलगडलेली नाहीत. निसर्ग माणसांच्या नियमांनी चालत नाही, म्हणूनच दरवर्षी वेगळी करामत दिसून येते. त्याप्रमाणे पाऊस लवकरही येऊ शकतो हे निसर्गाने दाखवून दिले आहे. अंदाज वर्तवण्यात आव्हाने आहेत, ती असलीच पाहिजेत, त्यातूनच नवे काही शिकता येते, नवे काही घडू शकते. २७ मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होईल असा अंदाज आहे. राज्यातील हवामान हळूहळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. ५ जूनपर्यंत ही स्थिती कायम राहील असा अंदाज आहे.

देशातील इतर भागातसुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो. आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतक-यांनी पेरणीची घाई करू नये. कारण हवामान कोरडे होण्याची शक्यता असल्याने पेरणीची घाई केली तर शेतक-यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे कृषी विभागाने म्हटले आहे. नाहीतरी ब-याच ठिकाणी मशागतीची कामेच झाली नाहीत, त्यामुळे पेरणी करणे शक्य होणार नाही. असो. सध्या तरी पर्जन्यजोरामुळे ‘कशी केलीस माझी दैना’ असे म्हणावे लागत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR